शब्दफुले वेचतांना....

Friday 19 August 2016

शिबीरातले दिवस २: योगाभ्यास- A man is as old as his spine is flexible

मागच्या लेखात शिबीराची ओळख, दिनचर्या सांगितली . या लेखात शिबीरात काय काय शिकलो हे थोडक्यात सांगत आहे. अर्थात शेवटी, केंद्रातले व्यासंगी, प्रगल्भ वक्ते हे सगळे अतिशय प्रभावीपणे अगदी सहजगत्या उलगडुन सांगतात. तिथले प्रदुषणमुक्त वातावरण, आहार-विहार आणी मुख्यतः सामुहिक साधनेचा खुप फरक पडतो. सकारात्मक स्पंदने मिळतात.
अष्टांग योगात यम नियम वगैरे असतात हे आपण वाचले/ऐकले आहे. पण यम नियम म्हणजे तरी काय, याबद्दल जे आम्हाला सांगितले ते इथे मुद्द्यानिशी मांडतेय . यातही ८ पैकी पहिल्या ५ बहिरंग योगावरच इथे सांगणार आहे.
नुसता प्राणायाम किंवा धारणा, ध्यान, समाधी हे इतके स्वतंत्र , विस्तृत विषय आहेत की ते त्या त्या वक्त्यांकडून ऐकणे हीच एक मोठी पर्वणी ठरेल!
*****
पातंजलयोगसुत्रात- १९५ सुत्रे आहेत.
सुत्र- सुत्र म्हणजे सायंटीफीक फॉर्म्युला. कमित कमी अक्षरात जास्तीत जास्त ज्ञान
अष्टांग योग- या ८ योगाच्या पायर्या नसुन ही योगाची अंगे आहेत.
महर्षी पातांजलीच्या अष्टांग योगातल्या ८ सुत्रांपैकी
१)यम
२)नियम
३) आसन
४) प्राणायाम
५) प्रत्याहार
हा बहिरंग योग आहे. जो अ‍ॅक्शन पार्ट म्हणजे साधना आहे. यातले महत्वाचे अंग म्हणजे प्राणायाम.
६) धारणा
७) ध्यान
८) समाधी
हे ३ अंतरंग योग असुन यातील 'ध्यान' हे महत्वाचे अंग आहे.
बहिरंग योगसाधनेची फलश्रुती अंतरंग योग असे म्हणता येईल.
पहिले ५ यम नियम सामाजिक स्तरावर व्यवहार कसा असावा हे सांगतात. आणि नंतरचे ३ नियम वैयक्तिक स्तरावर काय करावे हे सांगतात.
योगसाधना करायची असेल तर यम-नियमांचे महाव्र्ताने पालन केले पाहिजे, अनुव्रताने नाही- असे पातंजल मुनी म्हणतात.
महाव्रत- म्हणजे कोणत्याही परिस्थितीत नियमपालन तंतोतंत करणे.
"जाति देश काल समयावच्छिन्ना, सार्वभौम महाव्रतम | "
उदाहरणादाखल आपण हिंसा हा विषय घेतला तर
जाति- मनुष्याला मारणार नाही पण प्राण्यांना मारेन ,अशी हिंसा नसावी
देश- माझ्या देशातल्या माणसांना मारणार नाही पण परदेशातल्या लोकांना मारेन अशी हिंसा नसावी
काल- चातुर्मासापुरते अभक्ष्य भक्षण करणार नाही. पण इतर वेळी करेन अशी हिंसा
समय- सकाळी सकाळी खोटे बोलणार नाही, दिवेलागणीला खोटे बोलणार नाही. असा प्रकार नसावा.
जो अस जाती, देश, काल, समयाला अनुसरुन महाव्रताच पालन करतो तो खरा योगी होउ शकतो.
प्रत्येक यम-नियमासोबत एक शक्ति जोडली आहे. आणि महाव्रताने ते पालन केले तरच त्या शक्तीचे प्रकटीकरण होते.
योगत्व म्हणजे प्रत्येक जीवामधे ''शिव' आहे. प्रत्येक मनुष्यात सुप्त अध्यात्मिक शक्तीचा स्रोत (पॉवरहाउस्) आहे. योगसाधनेत या शक्तीचे जागरण आहे.
१) यम- सामाजिक स्तरावर पाळावयाची साधना. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य, अपरिग्रह
*अहिंसा- एक विशेष म्हणजे मानसिक स्तरावर केलेली हिंसा जास्त प्रभावी असते. "अहिंसा प्रतिष्ठायां तत् सन्निधौ वैरत्याग: "
जो योगी महाव्रताने अहिंसेचे पालन करतो त्याच्या स्वतःकडून तर हिंसा होणार नाहीच पण त्याच्या तपस्येच्या प्रभावात/ आभामंडलात, त्याच्या संपर्कात जो कोणी येईल तो माणूस असो की प्राणी तोसुद्धा वैरभाव विसरेल . अश्या ठिकाणी कट्टर वैर असणारे प्राणी सुद्धा गुण्यागोविंदाने नांदतात. या बाबतीत भगवान बुद्धांची एक कथा सांगितली जाते.
भगवान बुद्ध जिथे जंगलात तपश्चर्या करत होते, त्याच्या १६ किमी पर्यंतच्या परिसरात त्यांच्या तपस्येचे प्रभावक्षेत्र होते. अंगुलीमाल राक्षस जेव्हा त्यांना मारायला आला, तेव्हा टप्याटप्प्यावर त्याच्या मानसिकतेत बदल होत गेला आणि सर्वात शेवटी बुद्धापर्यंत पोहोचता पोहोचता त्याला उपरती झाली आणि तो भगवान बुद्धाना शरण गेला. (या वर आम्ही स्कीट सादर केले होते)
याबाबतीत मला श्रीवासुदेवानंद सरस्वतींचे ( टेंबे स्वामी) शिष्य नारेश्वर चे रंगावधूत स्वामी (दत्तबावनीकार) यांची कथा आठवली. ते साधनेसाठी जागा शोधात नर्मदातटावर फिरत होते. फिरता फिरता त्यांना एका ठिकाणी साप-मुंगूस, वाघ आणि इतर शाकाहारी प्राणी एकत्र खेळत आहेत असे दिसले. तीच जागा त्यांनी नक्की केली ती जागा म्हणजे नारेश्वर.
* सत्य- सत्याचा महाव्रती म्हणजे राजा हरिशचंद्र
"सत्यप्रतिष्ठायां क्रियाफलाश्रयत्वम "
असा मनुष्य मृत्यू जरी आला तरी सत्याची कास सोडत नाही. असे महाव्रताने सत्याचे पालन केले तर त्याला वाचासिद्धी प्राप्त होते. तो जे बोलेल ते सत्य होते.
श्री रामकृष्ण परमहंसाची कथा इथे सांगितली होती. की एकदा त्यांचा एक शिष्य अगदी इरेला पेटला की जो योगी नेहमी सत्य बोलतो त्याला वाचासिद्धी प्राप्त होते, तो बोलतो ते सत्य होते, हे खरे आहे का हे समजावून सांगाच गुरुजी! या शिष्याकडे रोज बागेतील फुले गोळा करून, त्यांचे हार करून कालीमातेला अर्पण करायचे काम होते. तो शिष्य तिन्ही त्रिकाळ गुरुजींची पाठ सोडेना. तेव्हा श्री रामकृष्ण म्हणाले, अरे हो बाबा, असे खरेच असते.
तेव्हा त्याने विचारले, की आता जर कुणी एका योग्याने ही इथली अनंताची पांढरीशुभ्र फुले लाल होतील असे म्हटले तर खरंच होतील का?श्रीरामकृष्ण ही वैतागून म्हणाले हो, होतील!
आणि हा शिष्य दुसर्या दिवशी पहाटे अनंताची फुले तोडण्यास गेला ते ओरडतच परत आला की अनंताला लाल फुले आली आहेत.
*अस्तेय - म्हणजे चोरी न करणे. मग ती वाड्मयचौर्य ही असु शकते. दुसर्याचे श्रेय लाटणे ही असु शकते.
* ब्रम्हचर्य- कोणताही इंद्रियोपभोग न घेणे हे ब्रम्हचर्य
*अपरिग्रह- म्हणजे बराच संग्रह न करणे, भेटवस्तूंचा स्विकार न करणे
२) नियम- शौच, संतोष, तपस, स्वाध्याय, ईश्वरप्रणिधान
*शौच- म्हणजे शुद्धता, पवित्रता मग ती शारिरीक, मानसिक दोन्हीही असेल.
* संतोष - समाधानीवृत्ती. आहे त्यात समाधान
*तपस- शरीर, मन यांचेसुद्धा तप असते. 'कार्येंद्रिय शुद्धी तपसः" ज्या साधनेने काया, इंद्रियांची शुद्धी होते ते तप.
"प्राणायामः परम तपः" - सर्व तपात प्राणायाम हे उत्कृष्ट तप आहे. कारण यात प्राणवायुचे नियमन आहे.
उपास करणे म्हणजे पोटाचे तप. प्रदक्षिणा घालणे हे पायाचे तप
*स्वाध्याय- मी कोण याचे उत्तर शोधण्याची प्रक्रिया. भगवद्गिता, उपनिषदे यांचा अभ्यास, या प्रकारच्या विषयांची चर्चा, व्याख्यान ऐकणे हा स्वाध्याय
*ईश्वरप्रणिधान- ईश्वराप्रती समर्पणाचा भाव. अर्थार्थी, जिज्ञासु, आर्त, समर्पण. सर्वात मोठे समर्पण हे अहंकाराचे समर्पण. परब्रम्ह व आपल्यात सर्वात मोठी भिंत अहंकाराची आहे. अहंकाराच्या आवरणाखाली 'आतला' इश्वर झाकोळुन गेला आहे.
आवृत्तचक्षु- 'आत' बघण्याचा यत्न
योग्याचा डोळा अंतर्चक्षूं असतो. चेतना अंतर्मुखी करतो.
शारिरीक, मानसिक, बौद्धिक, अध्यात्मिक सर्वच स्तरावर यम-नियम पाळावयाचे असतात.
३)आसन- योगासने
पतंजलीने पतंजलीयोगसूत्रात फक्त ३ सूत्रात 'आसने' हा संपूर्ण विषय संपवला आहे. ज्यात पहिले सूत्र व्याख्या, दुसरे त्याची पद्धती आणि तिसरे त्याचा परिणाम दर्शवते
व्याख्या: 'स्थिरं सुखम् आसनं "
पद्धती: 'प्रयत्नशैथिल्य अनंतसमाप्तिभ्याम"
परिणाम : "ततो द्वंद्वानाभिघात: "
१) व्याख्या- पहिल्या सूत्रात 'आसने म्हणजे काय' ही व्याख्या आहे. आसनात स्थिरता हवी आणि सुखाचा अनुभव आला पाहिजे.
आसनात आणि व्यायामात हा मूलभूत फरक आहे.
*योगासने ही मुख्यत्वे मनोनियंत्रणासाठी प्रक्रिया आहे. ज्यात स्थिरता नाही, दु:ख आहे, बल वापरणे आहे, स्पर्धा आहे, त्याला पतंजली 'आसन' म्हणत नाही.
*योगासने एका वेळी एकदाच करायची असतात.
* अंतिम स्थितीत जास्तीत जास्त वेळ टिकून राहणे याला महत्व आहे.
*व्यायामाचा परिणाम फक्त शरीरासाठी होतो. तर आसनाचा परिणाम शरीरसौष्ठवासाठी आहेच, आणि मनाच्या शांतीसाठी पण आहे.
*शरीराची लवचिकता वाढणे, वजन कमी होणे ही आरोग्याची लक्षणे आहेत.
“Man is as old as his spine”
माणसाचे वय त्याच्या मेरुदंडाच्या लवचिकतेवर अवलंबून असते "असे आजचे मेडिकल सायन्स सांगते.
शारीरिक स्तरावर अस्थिसंस्था, मज्जासंस्था, रक्ताभिसरण संस्था अशा विविध संस्थांना जोडण्याचे, त्यांच्यात सुसंगती घडवून आणण्याचे कार्य योगासने करतात.
२) पद्धती: 'प्रयत्नशैथिल्य अनंतसमाप्तिभ्याम"
शारीरिक स्थितीत प्रयत्नाची शिथिलता हवी. सहजपणे एफर्टलेस आसने करावीत.मानसिक स्तरावर अनंताचे (अनंत आकाश, अनंत सागर ) ध्यान करावे. अंतिम स्थितीत सहजपणा हवा. अवयवांवर कुठल्याही प्रकारचा अवास्तव ताण नको. ज्या स्थित्तीत सुखाची अनुभूती आहे ती आपल्याकरता अंतिम स्थिती आहे.
आसनांच्या अंतिम स्थितीत मन शरीरापासून विलग करून अनंतात विलीन करणे म्हणजे 'आसनसिद्धी' झाली.
एखाद्या आसनात अंतिम, सुखदायी स्थितीत तुम्ही कमीत कमी ४ तास २० मिनिटे राहू शकतात तेव्हा ते असं सिद्ध झाले, असे योगशास्त्रग्रंथात म्हटले आहे.
३) परिणाम : जेव्हा अंतसमाप्तीभ्याम स्थिती येते तेव्हा योग्याचे जीवनातील द्वंद्व नाहीसे होते. द्वंद्वाने मन असंतुलित होते. आसनांच्या सिद्धतेमुळे मनुष्य द्वंद्वातीत होतो. शीत- उष्ण, मान-अपमान ,सुख-दु:ख ही काही द्वंद्वाची उदाहरणे.
||समत्वं योग उच्चते|| या उक्तीप्रमाणे याचा अर्थ कोणत्याची परिस्थतीत मनाचे समत्व टिकले पाहिजे,तर मनुष्य योगी होतो. आणि आसनांनी हे साधते. हिमालयातल्या अतिथन्ड तापमानात अंगावर फक्त लंगोटी लावून काही योगिजन तपसाधना करतात ती योगामुळे शक्य होत असेल का?
गीतेत कृष्णाचे एक नाव 'योगेश्वर कृष्ण' असे आहे. त्याच्या चेहर्यावरचे स्मित कधीही ढळले नाही. कुरुक्षेत्रावर अतिशय तणावपूर्ण स्थितीत त्याने अर्जुनाला गीतोपदेश केला.
आसनांमध्ये 'जाणिवेचा विस्तार' कसा करता येईल याचा अभ्यास केला तर ती 'साधना' होईल. जाणिवपुर्वक आसने कशी करावीत हा शिबीरात गुरुच्या मार्गदर्शनाखाली शिकण्याचा प्रकार आहे. यावर सम्पुर्ण २ लेख होउ शकतात इतका हा विषय व्यापक आहे.
१) आसने ही जाणीवपूर्वक करावीत. यांत्रिकी पद्धतीने नाही. म्हणून असणे करतांना डोळे मिटलेले असावेत. आणि शरीरात होणारे बदल जाणीवपूर्वक बघावेत.
आवर्ती ध्यानात आम्ही उभ्याने ३, बसून ३ आणि पोटावर झोपून आसने करायचो.सर्वात शेवटी शवासन. ही सगळी आसने करतांना डोळे मिटलेले असायचे. लोक गम्मतीत म्हणतात, शवासन म्हणजे आमचे आवडते आसन! पण शवासन हे सर्वात अवघड आसन. आवर्ती ध्यानात ही शवासनातली ही स्थिती आमच्या ताई इतक्या सुंदर रीतीने सांगायच्या की आईच्या कुशीत आपण झोपलो आहोत असा फील यायचा. खरोखर काही लोकांना झोप ही लागायची.
२) स्नायूंची जाणीव- काही आसनात स्नायू ताणले जातात तर काहींमध्ये आकुंचित होतात ही पहिली जाणीव. जे स्नायू आसनांमध्ये भाग घेत नाही, ज्यांचा आसनांशी संबंध नाही ते स्नायू शिथिल असावेत.
३)पोट आणि छातीमधील दबावाची जाणीव. उदा. शशांकासन
४) रक्ताभिसरणातील बदल- अंतिम स्थितीत स्थिरत्व आणि शांती अनुभवली तर काही आसनात रक्तदाबात बदल होतो हा सूक्ष्म फरक ही लक्षात येतो. पादहस्तासन मध्ये रक्तप्रवाह मेंदूकडून चेहर्याकडे येत असल्याची जाणीव होते. याला स्थूलतेकडून सूक्ष्मतेकडे जाणे म्हणतात.
५) मज्जारज्जूमधील संवेदनांची जाणीव- ही सुद्धा सूक्ष्म जाणीव आहे. पश्चिमोत्तानासनात स्थिरत्व आले तर मेरुदंडातून सूक्ष्म करंट गेल्याची जाणीव होते.
६) ध्वनीस्पंदनांची जाणीव- शवासनात 'अ' 'उ' 'म' कार जप करतांना अनुक्रमे नाभीजवळ, छातीजवळ, आणि मस्तकात स्पंदनाची जाणीव होते. भ्रामरी प्राणायामात टाळूवर हात ठेवला तर स्पंदनांची जाणीव होते.
७) शरीरापासून विलग होणे- शवासन हे सर्वात कठीण आसन मानले जाते. आपल्या शरीरातून विलग होऊन आपणच आपल्या शरीराचे अवलोकन करत आहोत असा अनुभव योग्यांना येतो. याने देहबुद्धी नाहीशी होते. यात आपल्या शरीरात चेतना फिरवावी लागते. संपूर्ण शरीरातले तणाव शोधून ते बाहेर काढावे लागतात.
शरीरात सर्वात जास्त तणाव चेहर्यावर असतात. चेहर्यातही दाताच्या मुळाशी तणाव असतो.
८) अनंतसमापत्ती - आपल्या शरीरारापासून आपण वेगळे झालो की अनंतात विलीन होतो. म्हणजे अनंताशी एकरूप होणे. उदा. अनंत आकाश, अनंत सागराशी एकरूप होणे तीच अनंतसमापत्ती होय. यासाठीच डोळे बंद करून आसने करतात.
रोज किती आसने करावीत?
मागच्या बाजुस, पुढील बाजुस, डावीकडे, उजवीकडे मेरुदंड वाकेल अशी कॉम्प्लीमेंटरी आसने करावीत.
मेरुदंडाला पीळ (ट्वीस्ट होईल) तसेच मेरुदंड उलटा होईल असे कमीत कमी एक आसन तरी करावे.
३ प्रकारची योगासने आहेत.
१.ध्यानासन- पद्मासन, सिद्धासन, वज्रासन
२. स्वास्थ्यकर आसन- भुजंगासन, सर्वांगासन, शलभासन
३. आराम आसन- शवासन, मकरासन
पातंजलयोगसूत्रांचा मुख्यतः ध्यानासाठी उपयोग होतो.
४) प्राणायामः
प्राण म्हणजे जीवशक्ती. 'प्राण' आहे म्हणुन 'प्राणी' म्हणतात."प्राणस्य आयामः प्राणायमः" विश्वातल्या जितक्या शक्ती आहेत उदा. विद्युत शक्ती, चुम्बकीय शक्ती, गुरुत्वाकर्षण शक्ती या सर्वांचा स्रोत प्राणशक्ती आहे. आणि या जीवशक्तीचे नियंत्रण करणे हा प्राणायामाचा उद्देश.
शरीरातल्या जेवढ्या क्रिया आहेत, संस्था आहेत, त्यांना प्राणशक्ती लागते. विचारशक्तीचे कार्यही प्राणशक्तीमुळेच चालते. या शक्तीचे संयमन करणे म्हणजे प्राणायाम.
प्राणशक्ती ५ प्रकारे काम करते. प्राण, अपान , उदान, समान, व्यान
प्राण- शरीराच्या वरच्या भागात( उदा. डोळे, कान, नाक) काम करते.
अपान - शरीराच्या खालच्या भागात (उदा. मलोत्सर्जन, ) काम करते
समान - प्राण व अपान मध्ये समन्वयन करते. पचनसंस्थेचे कार्य यांच्यामुळे चालते.
व्यान- स्पर्श, रक्ताभिसरण क्रिया
उदान - हा वायू सुप्त स्थितीत असतो. सर्वसामान्यपणे असं म्हणतात की उदान वायू मृत्यूच्या वेळी स्थूल शरीरापासून मुक्त होऊन सूक्ष्म शरीराला घेऊन हा देह सोडतो.
पूरक - संथ गतीने घेतलेला श्वास
रेचक - त्याहीपेक्षा संथ गतीने सोडलेला प्रश्वास
कुंभक - रोखलेला श्वास
१:४:२ हे श्वासोच्छवासाचे प्रमाण आहे.
शरीरातल्या ९ संस्थानापैकी काही ऐच्छिक तर काही अनैच्छिक असतात.
चालणे, बोलणे, काम करणे - ऐच्छिक संस्था
हृदयाभिसरण, पचनसंस्था- अनैच्छिक संस्था
श्वसनसंस्था ही थोडी वेगळी आहे. ती थोडी ऐच्छिक तर काही प्रमाणात अनैच्छिक आहे. म्हणून प्राणशक्तीचे नियमन करण्यासाठी श्वसनसंस्थेचा आधार घेतला जातो.
प्राणायामाच्या २ शाखा आहेत .
* हठयोग शाखा (हठयोगप्रदीपिका ग्रंथ): पूरक-कुंभक- रेचक, यात नाडीशुद्धी आवश्यक आहे. कुंभकावर जास्त भर दिला आहे.
* वसिष्ठ शाखा (योगावसिष्ठ ग्रंथ) : पूरक-रेचक. इथे 'केवल कुंभका'वर(आपोआप येणारी स्थिती) जास्त भर दिला आहे.
सर्वसामान्यांसाठी वसिष्ठ शाखा जास्त उपयुक्त आहे. खरा प्राणायाम म्हणजे कुंभक. कुंभक अश्या ठिकाणी करावे जिथे शुद्ध हवा आहे, आहार सात्विक आहे, आहार, विहारावर नियंत्रण आहे, तसेच गुरूच्या मार्गदर्शनाखालीच करतात . हे शहरात शक्य नाही. कुंभक करण्यासाठी नाडीशुद्धी झालीच पाहिजे असे हठयोगप्रदीपिकेत वारंवार उल्लेख येतो.
नाडीशुद्धी म्हणजे काय? तर सर्वसाधारणपणे असे मानतात की आपल्या अन्नमयकोषांच्या बाहेरून प्राणमय शरीरकोष आहे. त्यात ७२००० नाडया आहेत ज्यातून आपल्या शरीराला प्राणशक्तीचा पुरवठा होतो. या नाड्या जर कुठे कुंठित झाल्या तर त्या ठिकाणी व्याधी होतात.
नाडीशुद्धी झाली हे कसे ओळखावे?
वपुपुषत्वम - सडपातळ, लवचिक शरीर
वदनेप्रसन्नता- चेहरा नेहमी प्रसन्न
नादेस्फुटत्वम - स्वर मधुर असतो
नयनेसुनिर्मले - डोळ्यात तेज असते
अरोगतम - कुठल्याही प्रकारचा रोग नाही
बिंदूजयम- वीर्यावर नियंत्रण
अग्निदीपम - जठर, पचनसंस्थेवर संपूर्ण नियंत्रण
ही सगळी लक्षणे ज्याच्या शरीरात प्रकट झाली तोच कुंभक करण्यास पात्र आहे असे हठयोगप्रदीपिकेत म्हटले आहे.
कुंभक जर नीट जमलां नाही तर योग साधण्याऐवजी रोग होतो.
त्या रोगाची लक्षणे पुढीलप्रमाणे- उचकी लागणे , धाप लागणे, दम कोंडल्यासारखा वाटणे, डोके दुखणे, कानात दुखणे ही चुकीच्या प्राणायामाची लक्षणे आहेत.
वसिष्ठ शाखेत म्हटलेय की सर्वसामान्य मनुष्याला पूरक रेचक संथ गतीने १:२ या प्रमाणात केले की 'केवल कुंभक' ही स्थिती आपोआप अगदी विनासायास येते. आणि ती सर्वात चांगली स्थिती आहे. जेव्हा शारीरिक मानसिक स्तरावर अतिरिक्त शक्तीची गरज असते, तेव्हा आपोआप श्वास रोखला जातो, म्हणजे 'केवल कुंभक' स्थिती येते.
४) प्रत्याहार- स्वम स्व विषयाप्रमोशे चित्तस्वरूपानुकाराइव इंद्रियाणाम प्रत्याहार:। इंद्रिये जेव्हा आपापल्या विषयातून असंलग्न होऊन चित्तात लीन होतात तेव्हा प्रत्याहाराची स्थिती येते.
पंचेंद्रियांना त्यांच्या विषयांपासून अलग ठेवणे, तोडणे. ते केले की बाह्यविश्वाची अनुभुती येत नाही. व योगी अंतर्विश्वाकडे वळतो.
इंद्रिये तत्व विषय
नाक- पृथ्वी - गंध
जिव्हा - आप - रस
नेत्र - तेज - रूप
त्वचा - वायू - स्पर्श
कान - आकाश - शब्द
आपले मन या पंचेंद्रियांच्या माध्यमातून विषयाशी संपर्क साधत असते.
बाह्यजगताची जाणीव आपल्याला पंचेंद्रियांमुळे होते. या इंद्रियांनी असहकार केला तर ती स्थिती प्रत्याहाराची आहे.
गाढ निद्रा म्हणजे प्रत्याहार नव्हे. कारण त्यात जाणीव नाही. इंद्रिये जाणीवपूर्वक असंलग्न झाली तर ती स्थिती प्रत्याहाराची.
****

Wednesday 13 July 2016

विवेकानन्द केन्द्र, योग शिबिर

तसे कॉलेजात असताना रोटरॅक्टचा युथ कॅम्प अटेन्ड केला होता. पण तो अगदीच ४ दिवसाचा. ४ दिवस भुर्र्कन उडुन गेले होते. त्या त्या वयातले अनुभव वेगळेच असतात. तेव्हा शरीर, मन दोन्हीही तरल असते. इतरांसोबत कुठल्याही सवयीचे अ‍ॅब्सॉर्बीन्ग चटकन होत असते. पण पन्नाशीला टेकल्यावर आधी असलेल्या सवयींना मुरड घालुन आणि ऊन वारे लागुन… वास्तवाचे टक्के टोणपे खाउन रिजीड झालेल्या शरीराला आणि मनाला वळण लावायला वेळ लागतो.वयानुरुप शिबीरे बदलत असतीलही.
याच वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत केलेले 'विवेकानन्द केन्द्राचे योग शिबीर' असेच बरेच काही शिकवुन गेले.
पिंपळद येथील १५ मे ते ३० मे, २०१६ या कालावधीतील योग शिबीरासाठी माबोकर मैत्रीण मंजूताई यांच्यासोबत जाण्याचा निर्णय झाला. पण घरुन निघताना निश्चय डळमळीत होउ लागला होता. माझ्या मुलाला घेऊनच मी हे शिबीर अटेंड करायचे असल्याने आनि त्याने ऐन वेळी नकार दिल्याने एकटीनेच जावे की जाउ नये अश्या द्विधा मनःस्थितीत जाण्यास तर निघाले. कधी नव्हे ते इतकी ऑफीशियल सुट्टी मिळाली होती. तिचा मस्त घरी आराम करत विनियोग करायचा की कुठल्याही शिबीरतल्या (ऐकीव)काटेकोर नियमात स्वतःला अडकवुन घ्यायचे या विचाराने अगदीच जीवावर आले होते. पण एस टी चे बुकिंग झाले होते, त्यामुळे नासिकपर्यंत तर जाऊ.. तिथे बहिणीकडे मुलाला पोचवुन पुढचे पुढे पाहु अश्या काहिश्या मनस्थितीत असतानाच पुणे सोडले.
संपूर्ण प्रवासात बहिणीशी/ मंजूताईंशी फोनवर बोलणे होत होते. शेवटी त्या दोघीनी अतिशय आग्रह धरल्याने १५ दिवस स्वतःला केंद्राच्या ताब्यात देउ... नाही आवडले तर ४ दिवसात कलटी मारु असा सुज्ञ विचार केला. नाशिक- ठक्करबाजारस्टँडवर मंजूताई, त्यांचे मिस्टर आणि आणखी एक जण उभे होते. त्यांनाही माझ्याच एस टीत बसवुन त्र्यंबकेश्वर येथे भर दुपारी साधारण दीड्च्या सुमारास पोहोचलो. तिथे दुपारचे जेवण घेउन स्पेशल गाडीने पिंपळद येथे दुपारी ३:३० ला पोहोचलो. डोंगराच्या कुशीतले छोटेसे गाव बघितल्यावर अर्धा थकवा दुर पळाला. तरी आता पुढचे १५ दिवस इथे काढायचे आहेत या भावनेने हृदय व्याकुळ झाले.
चक्क १५ दिवस... सकाळी ५ ते रात्री १० हे लोक आपल्याला कसे एंगेज ठेवणार ही उत्सुकता होती, आणि ती वारंवार मंजूताईंना मी बोलुन ही दाखवली होती. हॉलवर सामान टाकले आणखी ३-४ लेडीज आमच्या आधीच आलेल्या होत्या.संध्याकाळ झाली. ६:३० च्या सायंप्रार्थनेसाठी सर्वांनी एकत्र यायचे अशी सुचना आली. हॉलमधे डॉट ६:३० च्या ठोक्याला धीरगंभीर आवाजात सायंप्रार्थना सूरु झाली.आद्य शंकराचार्यांचे निर्वाणाष्टक सुरु झाले.शालिनीताईंच्या गोड हळुवार आवाजात 'मनोबुध्यहंकार चित्तानि नाहं ... हे शब्द कानी पडले आणि मनातल्या सगळ्या शंका कुशंकांचे निरसन झाले. आणि आपण अगदीच काही वनवासात येउन पडलो नाही याचा दिलासा वाटला.
दुसर्या दिवसापासुन सकाळी ५:३० ते रात्री ९:३० असे आमचे रुटीन सुरु झाले. आपल्या आपल्या कम्फर्ट झोन मधुन बाहेर आल्यावर, नाही म्हटले तरी सुरवातीचे ३-४ दिवस इथल्या परिस्थितीशी, कार्यक्रमसंहितेशी आणि सर्वच सदस्यांशी जुळवुन घेणे कठीणच गेले! पहाटे ५:३० च्या योगाभ्यासासाठी पावणेपाच ला उठणे अनिवार्य होते. मुळात पहाटे उठण्याची सवयच नव्हती. नाईलाजाने पहिल्या दिवशी पावणे पाच ला उठलो. टीम मधे असल्यावर मिळते जुळते घेणे ही पहिली पायरी. स्नानादी शौचाविधींसाठी नंबर लावणे, एका गावातल्या असतील तर एकमेकींसाठी नंबर लावणे, इथे एकमेकांचे इगो आडवे येणे, ते सांभाळून घेणे ...हे सगळे सग़़ळे प्रकार झाले. बरोब्बर ५:२० ला योगेश्वर हॉलमधे हजर जहालो. अगदी वेगवेगळ्या क्षेत्रातुन आलेले असुनसुद्धा इथे सर्वच जण शिबिरार्थी असल्याने सर्वजण समान लेव्हल ला आहोत हे समजले. मीराताईंची शिस्त/अनुशासनचे प्रथम दर्शन. पण कुठेही अतिरेक नव्हता. जबरदस्ती नव्हती.

ओंकाराचा ८ वेळा जप.. ओम सहनाववतु...झाल्यावर शालिनीताईंनी मधुर आवाजात प्रात:स्मरण सुरु केले आणि शरिरावर एक सुखद अनुभुतीची लाट उमटली. सामूहिक उपासनेचा परिणाम काय असतो तो कोणीही न सांगता अनुभवयास आला आणि त्याचबरोबर आपण इथे येण्याचा निर्णय अचुक होता याची खात्री पटली.
पहिल्याच दिवशी योगासने, सुर्यनमस्कार करतांना आपल्या शरीराची लवचिकता नष्ट झाली आहे याची प्रथमच जाणिव झाली. ७ वाजेपर्यंत योगाभ्यास संपवून आम्ही गीतापठणाला बसलो. गीतेतील कर्मयोगाच्या २६ श्लोकांचे संकलन आणि सुरेल चालीत त्याची आळवणी. यानंतर आमची 'चैतन्य', 'उत्साह', 'कौशल्य' , 'दृढता' अश्या वेगवेगळ्या गणात विभागणी झाली. . आम्ही ३० जण होतो.

सात्विक विचारांना पोषक असे सात्विक भोजन-अल्पाहार झाला. त्यानंतर ८ वाजता योगेश्वर हॉलसमोर जमायचे होते. आता वेळ होती श्रमसंस्काराची! सुरवातीला देशभक्तीपर गीत म्हणुन जोरजोरात नारे लावले. मग प्रत्येक गटाला कामे वाटुन देण्यात आली. योगेश्वर हॉल, आपापले निवास, बागकाम, आणि अन्नपुर्णा अशी साफसफाईची कामे होती. आणि मग खराटे, झाडुन, कुदळ, फावडे अश्या आयुधांसहित एकेक ग्रुपने नियोजित जागी कुच केली. सर्वच मन लावुन कामे करत होतो.

यानंतर ९ ते १० एक तासाची सुट्टी.. त्यात आपापल्या निवासस्थानी जाउन स्नानादी कर्मे उरकायची. फ्रेश होउन बरोबर १० वाजता योगेश्वर हॉल येथे जमायचे. तिथे १० ते ११ वाजेपर्यन्त विचारप्रवर्तक असे मा. विश्वासजी, मा दिक्षितजी, मा.सुजाताताई, मा. श्रीनिवासजी, मा. भानुदासजी यान्चे सेशन्स असायचे. सेशननंतर ,आज काय शिकलो यावर 'मंथन ' होई. गणशः चर्चेचे विषय वाटुन देत. ११ ते १२ अशी आपापल्या गटात चर्चा करुन कुणीतरी एकाने आपल्या गटाचे प्रतिनिधीत्व करत समोर जाउन तो विषय १० मिनीटात मांडायचा अशी संकल्पना होती. मग ते कधी मौखिक होत, तर कधी छोट्याश्या नाटिकेच्या स्वरुपात, तर कधी संपूर्ण गणाने समोर जाउन तो विषय मांडायचा अश्या स्वरुपाचे होत. मंथनाचे विषय आधी झालेल्या सेशनवर आधारीत असत तर कधी स्वामी विवेकानंदांच्या , एकनाथजी रानडे यांच्या पुस्तकातील काही लेखांचा संदर्भ घेउन असत.

यातुन टीम बिल्डीन्ग ची भावना होतीच. आपल्या टीमला रिप्रेझेंट करायचे तर ते उत्कृष्टच असले पाहिजे या हेतुन हिरीरीने भाग घेतला जायचा. चारीही टीम्समधे हेल्दी कॉम्पीटीशन असायची. यातुनच टीममधील काही अबोल सदस्यांना बोलके करणे, त्यांचे ही विचार समजावुन घेणे, त्यांना प्रतिनिधित्व करण्यास उद्युक्त करणे या सर्व प्रकारांनी सभाधीटपणा वाढला, आत्मविश्वासात वृद्धी झाली.

१२:३० ला भोजनासाठी अन्नपुर्णेत जायचो. तिथे ही गणशः भोजन वाढायची सेवा असायची. भोजनापुर्वी,ओम ब्रह्मर्पणम... हा श्लोक, त्यानंतर "प्रभो सेवाव्रत्या भक्त्या.. असे श्लोक सुजाताताई आमच्याकडुन गाउन घ्यायच्या. कडकडुन भुक लागली असतांना...समोर ताट भरलेले असतांना हे श्लोक म्हणणे संयमाची परिसिमा वाटायची. पण आता त्याची इतकी सवय झाली की आपापल्या घरी गेल्यावर, अगदी ऑफीसात सुद्धा टिफीन उघडला की आधी नकळत हात जोडले जातात ... आणि मुखी शब्द उमटतात. दुपारी भोजनासाठी १च तास आणि त्यात गणानुसार वाढायची सेवा. त्यामुळे काही वेळेस उशीर व्हायचा. तर दुसर्या गणातले मेम्बर आम्हाला वाढण्यासाठी थांबायचे. इतका सर्वांमध्ये एकोपा निर्माण झाला.

भोजनानंतर १ ते २:१५ विश्रांतीची वेळ. सव्वा दोनला वाजता परत योगेश्वर हॉलला गीतपठणासाठी जमायचे होते. दुपारची थोडीफार घेतलेली वामकुक्षी सोडुन भर २ वाजता परत हॉलवर जायचे सुरवातीला शिक्षा वाटायची. एकीकडे गीतपठणासारखा आवडता विषय होता. नंतर सवयीचे झाले. गीतपठणातील बारकावे, संस्कृतचे उच्चार, श्वासाचे चढउतार हे सर्व शिकायला मिळाले. पदावलीतल्या सगळ्याच गीतांमध्ये इतका गोडवा आहे आणि त्या तिघी ताई इतक्या समरसून शिकवायच्या की त्यात गुंगून जायचो, हा तास संपूच नये असे वाटायचे. लिंगाष्टक, श्रीनामनारायण, श्रीगणेशपंचरत्नस्तोत्र ' गिरकर उठना, चंदन है इस देश की मिट्टी, तन्मय हो जा मेरे मन, दिव्य ध्येय की ओर तपस्वी( केंद्र प्रार्थना), स्वामीजींवर रचलेले ' मूर्त महेश्वर...' ही माझी आवडती गीते.
त्यानंतर ३ वाजता चहा व्हायचा. मग पुन्हा एक अभ्यासपुर्ण सेशन. यात अष्टांग योग, भगवदगीता, योगीक जीवनपद्धती असे विषय होते. ४:३० पासुन पुन्हा योगाभ्यास. आता आसनानवर हळु हळु पकड येत होती. योगासने घाईघाईत करायची नसतात., अंतिम स्थितीत टिकुन राहणे हे जास्त महत्वाचे असते हे समजले. यानंतर खाऊ वाटप होई. खाऊ म्हणजे भाजके शेंगदाणे, फुटाणे, असं काही! मग निसर्गभ्रमणासाठी अर्धा तास राखुन ठेवलेला असे. यात काही ग्रुप जवळच्या टेकडीवर फिरायला जात. तर काहीजण तिथेच छोट्याश्या लायब्ररीत पुस्तके चाळत बसत.
त्यात एक दिवस तिथुन जवळच असलेल्या विवेकानंद केंद्र चालवत असलेल्या शाळेत गेलो. वळणावळणाचा रस्ता, प्रदुषण मुक्त हवा आणि निसर्गरम्य वातावरणात असलेली ही टुमदार शाळा. तिथेच बसून सायंप्रार्थना म्हटली. केंद्रातली सायंप्रार्थना म्हणजे अंतर्मुख होण्याची अवस्था. विलक्षण भावविभोर , अष्टसात्विक भाव जागृत करण्याची ताकत तिच्यात आहे.

रात्रीच्या भोजनानंतर ८ वाजता 'प्रेरणेतून पुनरुत्थान' हा माझा आवडता उपक्रम असायचा. यात विविध सामूहिक खेळ, अभिनय गीत, गुणदर्शन...! अभिनय गीतात चुकूनही सिनेमातील गाणी न घेता बालगीते घेतली होती. त्यामुळे आमचे कित्येक वर्षांपूर्वी हरवलेले निरागस शैशव पुन्हा अनुभवयास मिळाले. भन्नाट अनुभव होता तो!
त्यानंतर विश्वासाजींनी, सुजाता ताईंनी, प्रियाताईनी सांगितलेल्या बोधपर गोष्टी. या कधी अरुणाचलच्या असायच्या तर कधी शिलास्मारकाच्या, तर कधी स्वामी विवेकानंद, रामकृष्ण ठाकूरजींच्या जीवनातल्या. एखाद्या लहान मुलासारखे आम्ही त्यांच्याभोवती बसून या गोष्टी ऐकण्यात मग्न होत असू. त्यानंतर 'हनुमान चालीसा' होऊन प्रियादीदी संपूर्ण दिवसाचे अवलोकन करत. दिवसाभरातले संपूर्ण कर्म 'श्रीकृष्णार्पणमस्तु' करून आम्ही झोपायला जात असू ते दुसर्या दिवशी काय शिकायला मिळणार/ ऐकायला मिळणार या उत्सुकतेनेच..
८ दिवसातच इतके रमलो की आता ८ दिवसांनी शिबीर समाप्ती आहे या विचाराने सुद्धा हुरहुर वाटायला लागली.
मधे एक दिवस आमची त्रिम्बकेश्वरला पिकनिक झाली.आम्ही काही जणांनी पहाटे 3 किमी चालत जाणे पसंद केले. तिथे मंदिरात दर्शन घेऊन आम्ही सर्वांनी ' लिंगाष्टका' चा पाठ केला.नाष्टयाचे पैकेट्स सोबत घेतले होते, तिथे नवीनच झालेल्या म्हाळसादेवी मंदिराच्या आवारात बसून गप्पागोष्टी करत नाश्ता झाला. मीराताईंचे गाव ते, त्यांनी गावाबद्दल माहिती नसलेल्या अनेक गोष्टी सांगितल्या.
15 दिवसाच्या कालावधीत काय शिकलो नसेल? योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार, आवर्ती ध्यान, त्राटक, योगिक जीवनशैली, याबरोबरच आमच्याकडून जलनेती, वमन करून घेतले गेले.
गंमत म्हणजे, या वास्तव्यात टी व्ही, रेडीओ, वर्तमानपत्र ई कुठल्याच मीडियाशी संबंध आला नाही. मोबाईल, नेट ही अगदि जरूरिपूरते वापरत होतो, त्यामुळं विलक्षण मानसिक शांती मिळाली.
एक परिपूर्ण योगिक जीवनशैलीचा परिपाठ आम्हाला तिथेच मिळाला.

असो. तर ही झाली पार्श्वभुमी!

खाणे- पिणे, नोकरी करणे, फार फार तर वाचनाचा छन्द जोपासणे...असा आयुष्याला एक एकसुरीपणा आला होता. आपले ध्येय काय, कशासाठी आपण जन्माला आलो आहोत वै वै काही प्रश्न मधुन मधुन पडायचे. त्याची उत्तरे या शिबिराने दिली.
खरं तर ' व्यष्टी ते समष्टी' या प्रवासाची छोटीशी झलक शिबीरातच मिळाली, नाही का? सुरवातीला आत्मकेंद्री असलेलो आम्ही प्रत्येक जण या 15 दिवसात दृष्टी व्यापक होऊन दुसर्याचा, समाजाचा अगदी विश्वाचा विचार करत होतो. अशा अनेक प्रवर्तक विचारांची, आत्मानुभवाची शिदोरी घेऊन पिंपळदहुन निघालो.
आमच्यातल्या कित्येकांनी तर आपल्या गावी परतल्यावर कार्यास सूरूवात देखील केली. माझ्यासारखे काही जण वैयक्तिक पातळीवर तिथले विचार अंगी बाणवण्याचा प्रयत्न करत आहोत.
केन्द्राच्या कामाचा आवाका प्रचन्ड आहे. सहभागाची इच्छा आहेच आणि त्यासाठी थोडी थोडी सुरुवात आताच करायलाच हवीये. हे ही समजतय.
गीतेतल्या भक्तीमार्गाची कास धरली होती. त्याला आता कर्ममार्गाची जोड मिळाली तर कृतकृतत्या येइल, आयुष्याचा उत्तरार्ध समाधानाने व्यतित करता येइल असे वाटतेय.
*******
विवेकानन्द केन्द्राच्या शिबीरान्च्या तारखान्मधे सहसा बदल होत नाही.
पिम्पळद येथील हे शिबीर दरवर्षी १५ मे ते ३० मे या कालावधीत असते.
२० जून ते २९ जून जम्मूजवळ 'नागदंडी' येथे योगा शिबीर असते
ऑगस्ट मध्ये ८ ते १४ ऑगस्ट स्पिरिच्युअल रिट्रिट हे शिबीर कन्याकुमारी येथे असते
नंतर डिसेम्बर मध्ये कन्याकुमारी येथे २७ ते ३० डिसेम्बर असे ३ दिवसाचे युवा शिबीर असते.
तसेच १ ते १५ डिसेम्बर योगा शिबीर असते.
पुन्हा फेब्रुवारी मध्ये १९ ते २५ फेब्रुवारी अध्यात्म शिबीर कन्याकुमारी येथे आहे.
कन्याकुमारी किंवा काश्मीरच्या शिबिराचा नोंदणी फॉर्म त्या वेबसाइट वर दिला आहे.
फी नॉमिनल असते. आणि ती ऑनलाईन किंवा तिथे प्रत्यक्षात गेल्यावर करता येते.
फक्त रजिस्ट्रेशन आधी करून ठेवावे.
http://www.vivekanandakendra.org/ अधिक माहिती इथे मिळेल.

Monday 13 June 2016



महेश्वरची मंतरलेली पहाट!

"And, when you want something, all the universe conspires in helping you to achieve it.”
― Paulo Coelho, पॉलो कोहेलो च्या 'द अलकेमिस्ट' या पुस्तकात वारन्वार येणारे हे वाक्य आणि जवळपास
याच अर्थाचा हा ओम शान्ती ओम चा डायलॉग "कहते ही किसी चीज को अगर तुम दिल से चाहो तो, पुरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशीश मी लग जाती है… " ही वाक्ये प्रत्यक्षात उतरायला तसे प्रसंग घडावे लागतात.
***
महेश्वर या नावाचं भूत मानगुटीवर बसलं ते जगन्नाथ कुंटे यांच 'नर्मदे हर' वाचल्यावर.. मग सुरु झाल, इण्टरनेट वरून महेश्वर च्या नर्मदामाईचे फोटो बघत तासन तास त्यात हरवून जाणं ! ध्यासच घेतला महेश्वर ला जायचा. एक जबरदस्त गारुड होत या नावाच!
... आणि मागच्या वर्षी २०१५ डिसेंबर मध्ये हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. नविन वर्षाची सुरुवात नर्मदा किनारी करायची हे ठरवलच. महेश्वर, मान्डु, उज्जैन, इन्दौर, आणि नविन वर्षाला ओम्कारेश्वर ला असा त्रिकोण करायचा प्लॅन केला. सुट्ट्या जुळुन आल्या. नेटवरुन अन्तर मोजुन, हॉटेल्स बुकीन्ग करुन घेतल. मधेच ३-४ दिवस पुण्यात अभुतपुर्व थन्डी अचानक पडली. मनात म्हटलं, मैय्या परीक्षा घेतेय, घेऊ दे!
त्यात बडवानी हुन निरोप आला की तिथे २ डिग्री तापमान आहे. आणि नर्मदेच्या किनारी रहाणार म्हटल्यावर अजुनच थन्डी असेल. हे पाहुन आमच्या ग्रुपमधे २-४ जण गळाले.
तरी आमचा निर्धार पक्काच. काही झाल तरी जायचे...नर्मदा मैय्यावर सोपवुन. ती पाहुन घेइल. गाडीनेच जायचय ना, बरोबर गरम कपड्यान्चा स्टॉक घेउन. बहिण, तिचे मिस्टर, मी आणि माझा मुलगा..आम्ही चौघेच निघालो.
सकाळी साधारण ८ च्या सुमारात नाशिकहुन प्रस्थान केले. दुपारी बिजासन घाटात माता बिजासनीचे दर्शन घेउन
सन्ध्याकाळी ६ च्या सुमारास महेश्वरला पोहोचलो.
महेश्वर नर्मदेच्या उत्तर तटावर आहे. अहिल्यादेवी होळकर यान्च हे टुमदार गाव. होळकर पॅलेसच्या आवारातच होटेल होते. हॉटेल मैय्या किनारी, मैय्याचे सतत दर्शन होईल अशा तर्‍हेने बुक केले होते.
गम्मत म्हणजे तिथे अजिबात थन्डी नव्हती. मैय्याने आमची 'हाक' ऐकुन 'ओ; दिली होती. सन्ध्याकाळी जवळच्या राजराजेश्वर मन्दिरात जाउन आलो. मंदिरात अहिल्यादेवींच्या काळापासून तेवत असलेले भलेमोठे 11 दगडी दिवे... साजूक तुपाचे! पाहूनच मन भरून गेले. घाटावर ही चक्कर मारली. इथला घाट अतिशय सुंदर..घडीव पायऱयांचा... प्रचंड आकाराचा!
घाटावरची गर्दी कमी झाली होती. एखादा दुसरा परिक्रमावासी, 2-3 साधू, 2- 3 पुजारी इतकेच तुरळक लोक. अंधार पडायला सुरुवात झाली होती मात्र पलीकडचा काठ उजळून निघाला होता. होळकर राजवाड्यात त्या 2-3 दिवसात कुणी कन्येचे लग्न होते.पलीकडच्या काठावर लग्नाचं शाही वर्हाड उतरले होते. त्यांचे पन्नासेक तंबू दिसत होते. आणि त्या तंबुवर लागलेले लाईट्स ची असंख्य प्रतिबिंब पाण्यात हेलकावत होती. आमच्याजवळच कुणी एक स्त्री घाटावर येऊन मैय्याच्या पात्रात दिवे सोडत होती.आकाशातही एकेक नक्षत्र उगवत होते आणि माईचा चमचमता पदर अधिक खुलून दिसत होता. कुणी एक स्त्री घाटावर येऊन मैय्याच्या पात्रात दिवे सोडत होती. त्या दिवे सोडणार्या स्त्रीला आम्ही ," इथे पहाटे स्त्रिया येतात का स्नानाला? काही भीती नाही ना? वै वै पांढरपेशी प्रश्न विचारले. त्यावर तिचा प्रतिसाद आश्वासक होता.
भल्या पहाटे उठुन मैय्यावर स्नानाला निदान दर्शनाला जायच ठरवल खर... पण पहाटेच्या थन्डीत उठावेसे वाटेना. हो नाही चालु होते.शेवटी बहिणीने जोर लावुन धरला. ६ वाजता मैय्याच्या प्रशस्त निर्मनुष्य घाटावर आम्ही चौघे पोहोचलो.
आता मैय्या सोबतीला होती.भीतीचा प्रश्न नव्हता. इथली मैय्या अगदी संथ, शांत! जलतत्वांच अस हे अजिबात आवाज न करणार रूप माझ्यासाठी नवीन होतं. संपूर्ण पात्रभर पांढराशुभ्र धुक्याचा पडदा!उजाडल्याशिवाय हा पडदा उठणार नव्हता. आधी थोडेसे लांब बसून अंदाज घेतला. मग मैय्यापासून अगदी एक फुटावर कुडकुडत बसलो. अजूनही थंड पाण्यात पाय टाकायचे धारिष्ट होत नव्हते. मैय्या म्हणजे तीर्थजननी.. तिला भेटायला जायचे म्हणजे आधी पाय कसा लावायचा? हा विचार करून आधी त्या जलतत्वाला नमस्कार केला. हळूच आधी हात बुडवून ते पाणी प्रोक्षण केले.. ' नर्मदे हर' म्हणत माथ्यावर शिंपडले. आणि मग हळूच तळवे जलात सरकवले.. आश्चर्य! मैयाचे जल अगदीच काही थंडगार नव्हते. एक सुखद लहर शरीरातून... मऊशार पाणी तळव्यांना गुदगुल्या करतंय! एवढ्या अंधारातही मैय्याचा तळ आता स्पष्ट दिसतोय.छोटे छोटे मासे आणि त्यातही काही झपकन ट्युबलाईट पेटावी असे प्रकाशमय मासे.. पायाला लुचू लागलेत.या सुखानुभवात आपोआप डोळे मिटले गेले. हाच का तो शाश्वत आनंद? आतापर्यंत आनंदाचे क्षण का कमी आलेत? मुलगा झाला तो आनंद, नोकरी लागली तो आनंद, पगार वाढला, आत्मनिर्भर झालो हा आनंद ...किती काळ टिकला? मग शाश्वत आनंद कशात?
डोळे मिटले की दृष्टी 'आत' वळते म्हणतात. अचानक आठवलं आपले महाराजांच्या चरित्रात पण महेश्वर चा उल्लेख आहे ना? इथूनच गेले असतील का श्रीमहाराज? कदाचित इथेच बसून या मैय्याच्या साक्षीनेच त्यांनी आत्मसमाधी लावली असेल का? अंगावर रोमांच उठले.नकळत डोळे भरून आले.माझ्याही नकळत हे जलतत्व आता अंतर्यामी उतरू लागलेय. माझे सद्गुरु ज्या ज्या ठिकाणी फिरले अश्या तुझ्या किनारी तूच भेटायला बोलवतेस, मैय्या! हे तूच घडवून आणतेस!
तरीही हे मन वेडं असत ग! हे असे परमानंदाचे क्षण सोडून, सुख-दु:खाच्या हेलकाव्यात क्षणात आनंदित तर क्षणात चिंतीत तर कधी साशंक होत. आपल्या जीवनाचा हेतूच अजून लक्षात येत नाहीये. "
तिच्या उसळत्या पाण्याचा खळखळाट आता स्पष्ट ऐकू येतोय. जणू गिरक्या घेत मला ती म्हणतेय, किती ' साठवून' ठेवतेस आत? मी बघ मागचं सगळं विसरून कशी पुढेच धाव घेते. तुम्ही कधी काळी धुवून टाकलेले सगळे राग, लोभ, द्वेष ,मत्सर पोटात घालूनही कशी नितळ राहाते! ते पाण्यावर वहात चाललेलं पान दिसतय तुला?? किती मजेत चाललय! आहे का त्याला उद्याची चिंता कि भूतकाळातली संवेदना? प्रवाहाचा झोत आला की जोरजोरात उसळी घ्यायचं आणि संथ असेल तेव्हा मजेत पाण्यावर पहुडायचं. मधेच एखादी खडक आला की एक गिरकी घेऊन आपल्याच मस्तीत झोकुन द्यायचं! बघ, अस जगता येईल तुला?"
डोळ्यातुन धारा सुरु झाल्या होत्या.
"माई, तुझे किती उपकार!! सगळा संभ्रम दूर केलास! तू घडवून आणले म्हणून ही तीर्थयात्रा.. आम्ही फक्त तुझी इच्छा करायची. तुझ्या सान्निध्यात आलं की कुठलीही इच्छा करा.. मग ती ऐहिक असो कि पारमार्थिक , तू त्या पूर्ण करतेस. कशी होऊ त्याची उतराई??
आता हे जलतत्व चक्क बोलतंय माझ्याशी!
ती: मी जे मागेन ते देशील?
मी: खरंच! तुला जे हवे ते! हा देह देऊ? आता या क्षणी मृत्यू जरी समोर आला तरी आनंदाने पत्करेन मी.
ती: हाहा, तो पंचमहाभूतांकडून उसना घेतलेला देह मलाच परत करून काय साधणार?
मला जे हवंय ते दुसरंच!
मी: सांग मैय्या, काय आहे माझ्याकडे देण्यासारखं! जर हा देह, हा श्वास देखील त्या परम ईश्वराने दिलाय तर मी काय देऊ तुला?
ती: हे सगळं खरं असलं तरी एक गोष्ट आहे तुझी स्वतःची.
तुझा अहं, तुझा 'मी' पणा देऊ शकतेस तू??
मी: ( थोडं थांबून) धत! एवढंच ना, हा बघ दिला. एवढा माझा जप राहिलाय तो झाला की लगेच....
ती: ( खळखळुन हसत) हाहाहा ... म्हणजे अजूनही 'तू स्वतःच' जप' करतेस असं तुला वाटतय???
मी अवाक!निर्बुद्धपणे पहातच राहिले...
मनातले उसळते जल शांत झाले होते. हलकेच डोळे उघडले. काल संध्याकाळी आलेली तीच स्त्री पुन्हा मैय्याच्या पात्रात दिवे सोडत होती.हे दिवे आणि पलीकडच्या तिरावरचे अश्या असंख्य दिव्यांनी मैय्याचे पात्र उजळून गेले होते. नकळत हात जोडले गेले!
दूरवरून राजराजेश्वर मंदिरात होत असलेल्या आरतीचा आणि घंटेचा आवाज हे मंगलमय वातावरण अधिकच अधोरेखित करत होता!
पूर्वक्षितिजावर लाल गुलाबी रंग दिसू लागला होता.
....आणि मैय्या?
मैय्या खळखळत आपल्याच मस्तीत वाहत होती. मैय्याच्या पात्रावरचा धुक्याचा पडदा हळूहळु विरत होता!


आणि ...
मनातलाही!

Wednesday 11 May 2016

~सज्जनगडचा तो सुर्योदय~
तसं सज्जनगडावर पुर्वी एक-दोनदा जाणे झाले होते पण ते आपले उगाच भोज्याला शिवुन आल्यासारखे.
निवांतपणे जायला २०१२ चा मे महिना उजाडावा लागला.
झालं असं , त्या वर्षी आम्हां दोघी मैत्रिणींमधे एक 'प्रासंगिक करार' झाला की तिच्या वाढदिवसाला ती माझ्याबरोबर सज्जनगडावर येणार आणि माझ्या वाढदिवसाला ती मला गोंदवल्याला घेऊन जाणार.
ठरल्याप्रमाणे मी, माझा मुलगा, मैत्रीण शोभा १३ मे ला निघालो. मुलाला तिथल्या योगशिबिरासाठी ८ दिवस थांबायचे असल्याने सामान अंमळ जास्तच होते. मुलाला आदल्या दिवशी बाबा पुता करुन तयार केले होते, की मस्त ट्रेकिंग होईल.

दुपारी ३ वाजता सातारा एस टी स्टॅन्ड्वर पोहोचलो. तिथुन सज्जनगडची गाडी पकडुन अर्ध्या तासात सज्जनगडावर पोहोचु असे वाटले होते. पण ... पण आडवा आला!
त्यादिवशी नेमका शनिवार असल्याने गडावर गर्दी. एस टी ला पार्किंग नसल्याने अर्ध्यातुनच वळवण्यात येत होत्या.

झालं ! सॅक पाठीवर लादुन, भर उन्हात, घामेघुम होतआमची स्वारी हाश्श...हुश्श करत ५ वाजता एकदाची गडावर डेरेदाखल झाली. आदल्या दिवशी वळवाचा पाऊस झाला असल्याने जमिनीतील पाण्याची वाफ होऊन उन्हाचा चटका अधिकच लागत होता . खरोखर ट्रेकिंग च झाले.
गेल्या गेल्या आधी गडावर थन्डगार पाण्याने स्नान, आणि मग दर्शन घेउन सुर्यास्त पहाण्यासाठी मागच्या पठारावर पळालो.

उरमोडी धरणाच्या चमचमत्या पाण्याने आणि भन्नाट वार्‍याने स्वागत केल.
याच वाटेने जात असतील ना समर्थ मारुतीच्या दर्शनाला? ..
या पायवाटेनेच शिवराय आणि समर्थ त्या तिकडे लांबवर जाउन दरीच्या टोकावर बसून वार्तालाप, राजकीय सल्लामसलती करत असतील ना ?...
या खड्कावरच बसून समर्थ रोजची उपासना करत असतील का?... नुसत्या विचारांनी सुद्धा शहारा येतोय अंगावर!

अश्याच तंद्रीत धाब्याचा मारुती मन्दिरात दर्शन घेउन निघालो आणि धीरे धीरे सुर्यनारायण अस्ताला जाउ लागला. एक उदासमय, गुढ वातावरण! अंधार पडला तस गारवा अजून वाढला. भर उन्हाळ्यातही गारवा अनुभवायचा असेल तर समर्थांच्या पायाशिच जायला हवं !

आता आरतीसाठी राम मंदिरात! भारावलेल्या वातावरणात धीरगंभीर स्वरात संध्याकाळची आरती, श्रीधर स्वामीन्च्या मठात दर्शन घेउन भोजन प्रसाद घेतला. गडाच्या मागच्या बाजुस रुम मिळाल्या होत्या. सोनाळे तळ्याजवळ जरा रेंगाळलो खरं… तो आकाशात नक्षत्रे चमकु लागली होती. रात्र वाढु लागली... मागच्या दरवाजातुन बाहेर निघुन रुमकडे जातांनाआकाशात लक्ष गेले आणि थबकलोच. टिपुर चांदणं पडलं होतं .. तो ठळक शुक्रतारा,ते सप्तर्षी, तो ध्रुव, …. आभाळभर नुसती चांदण्यांची रांगोळी ... !
अवर्णनिय अनुभव...किती वेळ ते पहात बसलो आणि अचानक जाणवल, की गडाचा मागचा दरवाजा बंद झालाय. पठारावर गर्द अंधार... आणि एक जीवघेणी शान्तता आसमंत व्यापून आहे.
काकडआरतीला हजेरी लावायची होती. म्हणुन लगोलग रुमवर आलो. सौरउर्जेमुळे पहाटे गरमागरम पाणी मिळाले.

राममंदिरातली घंटा वाजु लागली होती. पहाटेच्या मंगलमय वातावरणात, सुरेख स्वरातली आरती, तिथल्या सजीव भासणाऱ्या श्रीराम- जानकी मूर्ती , चौपाया, सवाया म्हणणारे बालरामदासी, मनाचे श्लोक, कोमल वाचा दे रे राम...अंतर्मुख करणारी करुणाष्टके! त्यानंतर समाधीदर्शन करुन , श्रीधर स्वामी मठाकडे. तिथे दर्शन घेतले आणि चहा तयार असल्याची वर्दी आली. साडेपाच सहा वाजण्याचा सुमार असेल. समर्थ सेवा मंडळाजवळच्या उपहारगृहातून चहाचे कप घेतले...आणि सहज जाणवले. पुर्वेकडे तांबडं फुटु लागलं होतं .
एक मस्त, भन्नाट आयडीया सुचली..... चला चहाचे कप घेउन अगदी दरीच्या काठावर जाउन बसु. सुर्योदय पहाता पहाता चहा घेउया... अफलातुन!

जाउन बसलो दरीच्या काठावर. समोरची काळीकभिन्न डोंगररांग आता कात टाकून निळी-काळी- करडी दिसू लागली होती. तिच्यावर निळसर धवल धुक्याची रेषा!दरीतलं गाव, परळी.. हळुहळु जागं होतय. आदल्या दिवशी पडुन गेलेल्या पावसाने धुक्याची अलवार चादर गावावर पसरलिय. ते पहाता पहाता आम्ही कशासाठी आलो तेच विसरलो. अश्या भारावलेल्या मनस्थितीत किती वेळ गेला कुणास ठाउक! वातावरणातला उच्चांकी प्राणवायु भरभरून घेत होतो. बाजूला खडकावर ठेवलेला चहा आमची वाट पाहून केव्हाच गार झाला होता.
तेवढ्यात भानावर येत शोभाची हलकीशी आरोळी ," नयने ते बघ! क्षितिजावर!"!
'आहा' असं उच्चारायला केलेला तोंडाचा 'आ' तसाच वासलेला राहिला. पूर्व क्षितीजावर केशरी करंडा लवंडून रंग पसरलाय , डोंगराच्या आडून धुक्याची चादर दूर करत केशरी तांबूस गोळा डोकावतोय…वर येतोय. सहस्त्ररश्मी आपले सहस्त्र किरणे उधळत वर येत आहेत. काय दृश्य होते ते!!
अगदी अंतर्यामी साठवून ठेवावे असे!!
सगळच जादूमय!

अश्या वेळी कैमेरा बाहेर काढायचा असतो हे सुद्धा विसरलोय.
दोघीतला संवाद केव्हाच बंद झाला होता.
दूर सर्वदूर… नजर पोहोचेल तिथे डोंगररांगा… आणि ही आसमंतात व्यापून विलक्षण शांतता! आता या क्षणी या पृथ्वीतलावर आपण अगदी एकटे… कुठलीही वासना, पारमार्थिक ईच्छा, महत्वाकांक्षा,भय, द्वेष, मत्सर, संघर्ष... हेव्यादाव्यांच्या मनातल्या परिघात चालणाऱ्या व्यर्थ खेळाच्याही पार!
सगळच अलौकिक! भान हरपुन हे दृश्य... ही नीरवता हृदयात साठवावी अशी!
ही असामान्य शान्ति आता आत खोलवर झिरपतेय...पुढे तिचे लोट होत आहेत नसानसात... पेशीपेशीत! देह विरघळतोय कणाकणाने ! मी निर्विकार.… मी निर्विकल्प! मी आकारहिन्, अस्तित्वहिन् ! मी देहातीत! मी कोण? सोSहं!! विश्वाच्या अगणित पसार्यात एक बिंदु … इतकंच माझं अस्तित्वं ! हे पिसासारखं हलकं झालेल मन वाऱ्याच्या हलक्याश्या झूळकेवर विहरतय!
हीच का ती मुक्तावस्था, एकमेव अद्वैत अवस्था? चिदाकाशात भरून राहिलेल फ़क्त अलौकिक चैतन्य! इथे किती असीम शान्ति आहे!

त्या मंतरलेल्या अवस्थेत किती तरी वेळ तसच बसून होतो.
तेव्हा कुठे माहित होतं ही फक्त नांदी आहे... हा सुर्य श्री क्षेत्र गोंदवल्याहुन श्रीरामाच्या भेटीचं निमंत्रण घेऊन आलाय ते आणि आपल्या आयुष्यात तनामनाला उजळवणारी पहाट फुलवणार आहे ते!

Saturday 10 October 2015

ह्या इथुन, गल्लीच्या कोपर्‍यावरुन उजवीकडे वळलं ना…
की एक लालबुंद गुलमोहर आहे!
तिथून जातांना गदगदुन हलतो नि खुणावतो आताशा...
" बघ मी कसा बहरलोय ' अस म्हणत!
वाटेतली एका फाटकावर चढलेली नखरेल सायली
हळुच वाकुन आपल्याशी सलगी करते... कानात कुजबुजते!
आणि कधीकधी हे निळभोर आकाश एखाद्या ढगाच्या तुकड्याशी दिवसभर कशी दंगामस्ती करते हे ही दिसु लागलय... माझ्या एवढ्याश्या खिडकीतुन!
आपण गाडी लावतो ना तिथे एक पिंपळ आहे!
रोज सळसळुन स्वागत करतो तो ...हे आताच उमजु लागलय!
नेहमीची ही खुरटलेली झाडेही हिरवीगार होउ लागलीयेत!
आणि तो कालच पाहिलेला एवढासा बहावा!
भरघोस माळा लटकवुन वाकुल्या दाखवत असतो...
हे.. हे... सगळ नव्यानेच अनुभवायला मिळतय सध्या!
कितीतरी गोष्टी नव्यानेच समजतायत सध्या!
नवेच वाहु लागलेत म्हणे वारे!
नेहमीचेच असुनही... अनोळखी वाटु लागले आहेत रस्ते!
...
...
अरेच्चा, आणि...आणि हे झोकदार वळण!... हे कसं दिसलं नाही आतापर्यंत ??
( छे, कुणास ठाऊक! कुठे निसटलीत मधली काही वर्षे?)



अज्ञाताच्या गुढ वाटेवर
जलाशयाच्या काठाशी
सृष्टीच संगीत ऐकतांना
विहरणारी शब्दांची पाखरे
निशब्द होऊन हळुच
विसावतात मनाच्या
गाभार्यात!

 
अंधाराच्या पायघड्यांवर
दूरवरून रेलत रेलत
येणारे उजेडाचे तरंग
उजळत जातो मनाचा
एकेक कोपरा...

विरळ होत जाते
अस्तित्वाची जाणिव
नेणिवेच्या पार....
श्वासोच्छवासाची लयीत
उर्ध्व नजर ब्रम्हरन्ध्राकडे
एकेक दीर्घ श्वास ….
खोल खोल नाभीपर्यंत
ओघळत जातो अंतर्नाद
अन मग सुरु होतात
रंगाची आवर्तेने...
अस्तित्वाचा विलयाचा
सोहळा...

शिथील गात्रे, वृत्ती स्थिर,
उर्मी निवळलेल्या
अस नितळ नितळ होतांना
देहाच्या कणाकणातून,
पेशीपेशीतून
रंध्रारंध्रातून ….
झिरपत जातांना
विरळ होत...
एकेक शृंखला
तुटत जाते…
एकेक आवरण
उलगडत…
अंतरातील नादब्रम्ह
एकरुप होते
ब्रम्हांडातल्या
त्या आकाशतत्वाशी
...
आणि मग चिदाकाशात
भरुन रहातो
फक्त नाद 

अनाहत नाद.....!

Saturday 8 February 2014

"तुमचे पायी ठेविले मन"- संत तुकाराम महाराजांचे परमशिष्य श्री निळोबाराय यांचे जीवनचरीत्र.



नाशिक येथील श्री. नीळकंठ मोहिनीराज नांदुरकर यांनी अल्पशा संदर्भ सामग्रीवर संत निळोबाराय यांचं जीवनचरित्र लिहिलं आहे. त्यावरुनच निळोबांचा अल्पपरिचय करुन देते.

उपलब्ध सामग्रीनुसार निळोबाराय यांचा जन्म इ.स. १६३५ मधे झाला. घोडनदीकाठचं शिरुर गाव. तिथले शिवभक्त मुकुंदपंत यांच्याकडे 'कुलकर्णी'पद होतं. सारा गाव मुकुंदपंतांना पंतकाका म्हणे. मुकुंदपंत म्हणजे अतिशय सात्विक आणि सत्योपासक शिवभक्त. लग्नाला दोन तपं उलटुन गेली तरी पोटी मुल नव्हतं. काया वाचा मने अगदी निष्काम भावनेने भगवान रामलिंगाची सेवा केली. कधी ऐहिक गोष्टींची याचना केली नाही. विचार हाच की शाश्वताकडे अशाश्वत गोष्टी मागुन आपल्या भक्तीस उणेपणा आणायचा नही. पण कुटुंबाने खुपच आग्रह केल्यामुळे महाशिवरात्रीस भगवान श्री रामलिंगास अभिषेक करतांना साकडं घातले. आणि त्याच रात्री रामलिंगाने स्वप्नात येउन दृष्टांत दिला. प्रभु म्हणाले," वत्सा, तुझी एकनिष्ठ भक्ती आम्हांस पावली. तुझी कामना पुर्ण होईल. पुढील संवत्सरीच तु पुत्रवान होशील. तुझ्या वंशी कुलदीपक हरिभक्त उपजावा ही मुळी ईश्वरी योजनाच आहे. तुझा पुत्र भगवदभक्त होउन संत म्ह्नणुन विख्यात होईल. तुजप्रत कल्याण असो".
राधाबाई निळोबारायची आई. थोड्याच दिवसात 'ती' गोड बातमी कळली. आणि राधाबाईंचे कोडकौतुक सुरु झाले. दिवस जात होते. राधाबाईंना मुलखावेगळे डोहाळे लागले. त्यांना वाटे, "किर्तन करावं. पायात चाळ बांधुन अन हाती चिपळ्या घेउन नाचत नाचत पंढरीस जावं. विटेवरलं ते सावळं परब्रम्ह डोळे भरुन पहावं". आणि पंतांनी त्यांचे डोहाळे पुरवायचं ठरवलं. अक्षयतृतीया ही तिथी ठरली. वीस बैलगाड्या, दहा घोडी, भांडीकुंडी, शिधासामग्री, कापडचोपड, तंबु, कनाती, आचारी, पाणके म्हणता म्हणता तीसेक माणसं झाली. शिवाय वाटेत संरक्षणासाठी पंचवीस हत्यारबंद स्वार. मजल दरमजल करत, मुक्कामाच्या ठिकाणी भजन, किर्तन करत मार्गी लागले. नवमीला तिसर्या प्रहरी पंढरीस पोचले. उभयतांनी दशमीस पहाटे महापुजा केली. तेवढ्यात वर्दी आली की देहुचे थोर संत तुकाराम महाराज २०-२५ मंडळींसह विठ्ठलमंदिरी आलेले आहेत. बातमी ऐकताच मुकुंदपंत, राधाबाई आनंदले. दोघांनीही तुकोबाचे दर्शन घेतले. ऊन्ह उतरल्यावर महाराज वाळवंटातच किर्तनास उभे राहिले. त्यांच्या रसाळ किर्तनाचा आस्वाद घेउन पंतांनी महाराजांना बिदागी दिली.
सातवा महिना लागताच राधाबाईचं थाटात डोहाळेजेवण झालं. श्रावण शुद्ध प्रतिपदेला बाळाचा जन्म झाला. आणि पाचवी पुजताच पंतांनी बाळाची जन्मपत्रिका पाहिली. भगवान रामलिंगाने सांगितलेलं तंतोतंत आढळलं. बाळाचं नाव 'निळकंठ' ठेवण्यात आलं. दिसामासांनी निळोबा वाढु लागले. अवध्या तिसर्या वर्षीच आपल्या बोबड्या स्वरात पंतांच्या साथीने रुद्र म्हणु लागले. पाचवं वर्ष पार पडलं आणि पंतांनी निळोबाची मुंज ठरवली. ठरलेल्या मुहुर्तावर निळोबांची मुंज झाली. बटुवेशात तर तो फारच गोंडस दिसत होता. क्षौर केलेले, मागे घेरा, गोरापान, कपाळी गंध, डोळ्यांत काजळ, गाली दृष्टबोट, गळ्यात यज्ञोपवीत, कमरेस कौपीन व मुंज हाती दंड,मोठं गोजीरं रुप. मकाशिर्‍यांचे कुलोपाध्ये शेषाचार्य पोळ म्हण्जे मोठा ज्ञानी माणुस. पार काशीपर्यंत त्यांच्या विद्वत्तेचा गवगवा झालेला. पंतकाकांनी निळोबारायास मांडीवर घेउन त्याच्या कानी गायत्री मंत्र उपदेशिला. मग शेषाचार्यांनी त्याला ब्राम्हणांची कर्तव्ये सांगितली.
रात्री भिक्षावळही थाटात निघाली.
निळोबांचं पाठांतर उत्तम. पलोबां(स्नेह्यांच्या) घरातील ७-८ पिढ्यांनी जमवलेली ३००-४०० ग्रंथांची ग्रंथसंपदा मिळाली आणि निळोबांचे वाचन सुरु झाले. त्यांचं वाचन अगदी स्पष्ट. आवाज खणखणीत त्यामुळे आजुबाजुच्या आया-बाया येउन बसु लागल्या. नंतर गर्दी वाढु लागली. काही पुरुषही येउ लागले. निळोबा मधुन मधुन छान निरुपण करत. भावार्थ रामायण झालं, नाथभागवत झालं. पाठोपाठ ज्ञानेश्वरी झाली. मग हे तिनही ग्रंथ त्यांनी स्वहस्ताक्षरात दीड्-दोन वर्षात नकलुन काढले.
बघता बघता निळाला १६वं लागलं. मधल्या ४-५ वर्षाच्या काळात त्याने शेषाचार्यांकडुन संस्कृत शिकुन घेत्लं होतं. पंतकाकांकडुन कुलकर्णीचे कामकाज शिकुन घेतलं. शिवाय ज्ञानदेव, नामदेव व एकनाथ महाराज यांचे अभंग, गौळणी, भारुडं हे सारं नकलुन घेतलं.
आता राधाबाईंना (निळोबांच्या आईला) सुनमुख पहायची घाई झाली. पंतांकडे तिने टुमणं लावलं. वाळकीच्या अप्पासाहेब जहागीरदारांची मुलगी मैना ही सून म्हणुन मकाशिर्यांच्या घरात आली. आणि वर्षभरातच भगवान रामलिंगाच्या आज्ञेने पंतांचं निर्वाण झालं. निळुचे पितृछत्र हरपले आणि दोनच महिन्यात मातोश्रींनी जीवनयात्रा संपवली.
मध्यंतरीच्या काळात निळुच्या सदाचारणाबद्दल आणि कुलकर्ण्यांच्या कुशलतेबद्दल त्याच्या भाऊबंदात मत्सराचा डोंब उठला. नागूअण्णा मकाशिर्यांची पोरं नि नातवंडं अति टवाळ. निळूला जाता येता पिंपळपारावर बसुन चिडवु लागली. इतकं की थेट सुभेदारापर्यंत चहाड्या करण्याची त्यांची मजल गेली. आणि एक दिवस नेमकी विजयादशमी पाहुन १०-१२ स्वारानिशी तहशीलदार हिशेब तपासणीसाठी आला. बोलुन चालुन यावनी राजवट. निळोबा पुजेस बसले होते. तहसीलदाराची भाषा उर्मट. निळोबा तडक चावडीवर गेले.मुजरा करुन दप्तर तहसीलदारापुढे ठेवले. -सर्व हिशेब चोख. कुठे एवढीशीही चुक नाही. पण तेवढ्या एका प्रकाराने निळुचं कुलकर्णीपदावरचं मन उडालं. हरिभक्तीत व्यत्यय येतो ते काम करायचं नाही. भगवान श्रीरामलिंगाच्या साक्षीने दप्तर पिराजी पाटलाकडे सुपुर्द केले आणि ग्रामत्याग केला.
पराशर ऋषींची तपोभुमी पारनेरास प्रयाण केलं. पलोबांच्या श्वशुरांचे एक घर रिकामेच होते. अंमळ दुर, गावाच्या टोकाला,पण दोन खणी, तीन खोल्यांचे- चौफेर बाग अन जवळच श्रीनागेश्वराचे मंदिर. निळोबारायास आणि मैनेस हे घर फार आवड्ले. कर्मधर्मसंयोगाने नागेश्वराचे पुजारीपण गावकर्यांनी निळुस दिले. निळूस त्याच्या आवडीचे काम मिळाले. पहिल्याच एकादशीस त्याने देवळात कीर्तन केले. ते इतके बहारीचे झाले की गावकरी खुप आनंदले.
निळोबास आता पंढरीची ओढ लागली होती. ज्ञानोबा माउली, नामदेव, चोखोबा, गोरोबा, जनाई, नाथमहाराज, तुकाराम महाराज अशा थोर थोर संतांनी वर्णिलेलं ते विटेवरचं सावळं परब्रम्ह डोळे भरुन पहावं अशी तीव्र इच्छा निर्माण झाली. काही आठवड्यातच मैनेस दिवस गेले. आणि एका पौषात सुमुहुर्तावर सगळे पंढरीस निघाले. जशी पंढरी जवळ येउ लागली तशी निळोबांची वृत्ती प्रफुल्लित झाली. दुपार टळत आली होती. पंढरीच्या वेशीस पोहोचले आणि निळोबाने तडक गाडीतुन उडी मारली. वेशीसमोर दंडवत घातले. त्यांचे डोळे प्रेमाश्रुंनी भरले होते.
अचानक त्यांच्या मुखी काव्य उमटले.

झाली भाग्याची उजरी| दृष्टी देखताची पंढरी||
ठेविले तो कर कटी| जेणे अवलोकिला दिठी||
चंद्रभागे केले स्नान| भक्तां पुंडलिकाचे दर्शन||
निळा म्हणे वैकुंठवासी| प्राणी होईल निश्चयेसी||

बाजीनानांनी लगेच लिखाणाची सामग्री गोळा केली आणी तो उतरवुन घेतला.
नुसते पंढरपुराच्या वेशीच्या दर्शनाने ही अवस्था. तर प्रत्यक्ष पांडुरंगाच्या दर्शनाने तर त्यांच्या काव्यगंगेस पुरच यावा. आणि झालेही तसेच. गाभार्यात जाताच निळोबांचे भान हरपले. त्यांनी श्रीचरणांना मिठी घातली. प्रेमाश्रुंनी श्रीचरण भिजले. आणि ओठी शब्द आले:

सुकुमार साजिरे ध्यान| धरिले जघन दोन्ही करी||
विटेवरी दिव्य रुप| कोटी कंदर्प वोवाळीले||
तुळसी माळा वैजयंती| कौस्तुभ दिप्ती पदकांची||
निळा म्हणे हृदयावरी| दिली थोरी द्विजपद्मा||
हा पहा गे विटे उभा|सच्चितानंदाआ हा गाभा||
देखे सकळांचाहि भाव| अक्षय हे याचे नाव||
जेथे तेथे जैसा तैसा| नव्हे न्यून पुर्ण ऐसा||
निळा म्हणे माझ्या जिवी| ठेला जडोन तो गोसावी||
सगुण स्वरुप तुमचे हरी|शोभते हे विटेवरी||
तेणे लागली टकमक| डोळां आवडे आणिक||
मना बुद्धिसीही भुली|इंद्रिये गुंफोन राहिली||
निळा म्हणे तनुप्राण| गेली आपणा विसरोन||

निळोबाचा एक आठवडाभर मुक्काम पंढरीस होता. रोज सायंकाळी निळोबा राऊळी किर्तन करत असे.ते रसाळ किर्तन ऐकण्यास रोज गर्दी वाढु लागली.भाविक त्यांना संत निळोबाराय म्हणु लागले. लोकांची उपाधी वाढु लागली तसं निळोबांनी मुक्काम हलवण्याची तयारी केली. पंढरीच्या त्या मुक्कामात श्री पांडुरंग व त्याची पुण्यनगरी यावर निळोबांनी सुमारे दिडशे अभंग रचले.
श्री क्षेत्र आळंदीसही तोच प्रकार. श्री ज्ञानदेवांच्या समाधीवर मस्तक टेकवता निळोबांस गहिवरुन आले. आणि त्यांच्या मुखी ज्ञानेशाची स्तुती उमटली.

बोलवितां बोले वेद| म्हैसा सुबद्ध स्वरान्वये||
काय येक न करा देवा| भिंती चालवा निश्चेष्ठित||
शिष्यालागे देतां बोध| न लागे पलार्ध निमिषहि||
निळा म्हणे ज्ञानेश्वरा| मज अंगिकारा रंका दीना||


दुसरे दिवशी श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीची षोडशोपचार पूजा करुन निळोबांनी स्वरचित आरती म्हटली. नंतर तिथे त्यांचे किर्तन झाले.ते संपताच देवस्थानातर्फे माउलीचा प्रसाद म्हणुन निळोबारायास भरजरी शालजोडी पांघरण्यात आली. बिदागी म्हणुन श्रीफल व ३ सुवर्णहोन देण्यात आले. त्यांनी ते होन परत केले व म्हणाले:

कोणतीही न धरुनी आशा| भजावे जगदिशा किर्तनाते||
मग तो कृपेचा सागर| उतरील पार भवसिंधु||
तोडोनिया ममता जाळ| करील कृपाळ वरी कृपा||
निळा म्हणे आवडी त्यासी| कीर्तनापाशी तिष्ठतसे||

नंतर निळोबांनी देहुस प्रस्थान केले. त्याआधीच तुकोबांनी वैकुंठगमन केलं होतं. तेथे नारायणबुवा (तुकाराम महाराजांचे सुपुत्र), वृद्ध आईसाहेब, महाराजांचे भाऊ कान्होबाकाका यांची भेट झाली. ४० दिवस मुक्काम तेथे करुन त्यांनी तुकोबारायांचे जवळपास ४००० अभंग नकलुन काढले. तुकोबारायांची परम शिष्या संत बहिणाबाई यांची भेट तिथेच झाली. आणि तिथेच निळोबाने मनोमन तुकोबारायांना गुरु मानले. एवढच नाही तर प्रत्यक्ष त्यांच्याकडुनच अनुग्रह घेणार हा निर्धार केला. देहुवरुन आल्यापासुन निळोबांच्या मनास स्वस्थता नव्हती. "आम्हास श्री तुकारामबोवांनी अनुग्रह दिला पाहिजे" सतत हाच ध्यास.
आणि एक दिवस त्यांनी ठरवलं की आपण धरणं धरायचं. सद्गुरुंचं दर्शन होईतों अन्नपाणी त्यागुन त्यांचा जप करत बसायचं. निष्ठा पणाला लागेल, पण बघु सद्गुरु कशी कृपा करीत नाहीत ते.
झाले. निळोबा धरणं धरुन बसले.एकेक आठवडा जाउ लागला.आवाज क्षीण झाला. अशक्तपणा वाढु लागला. एक्केचाळीस दिवस झाले आणि तुकोबारायांनी स्वप्नात दृष्टांत दिला. मंत्रही दिला. त्यांची परिक्षा पहाण्यासाठी आधी श्रीहरीने त्यांना दर्शन दिले. तेव्हा निळोबांची अवस्था "रुप पाहता लोचनी| सुख झाले वो साजणी|| अशी झाली. पण ते त्यास म्हणाले,"

येथ तुजलागी बोलविले कोणी| प्रार्थिल्यावाचुनी आलासी कां||
प्रल्हादा कैवारी दैत्याते दंडाया| स्तंभी देवराया प्रगटोनी||
तैसे मज नाही बा संकट| तरी का फुकट श्रम केले||
निळा म्हणे आम्ही नोळखूच देवा| तुकयाचा धांवा करितसे||

धन्य दे निळोबा. प्रत्यक्ष भगवंताला असं म्हणाले. आणी मग भगवंताच्या ठिकाणी तुकोबाराय दिसु लागले. निळोबाने त्यांच्या पायी मस्तक ठेवले. प्रेमाश्रुंनी त्या पवित्र श्रीचरणीं अभिषेक केला. तेव्हा महाराजांनी मस्तकी हात ठेवुन म्हटले," निळोबाराय, भागवत धर्माची ध्वजा पुढे चालवा! वैराग्यवृत्तीने किर्तनद्वारा लोकांन भक्तिमार्ग दाखवा. आणि "नाम संकीर्तन साधन पै सोपे| जळतील पापे जन्मांतरे|| हा अभंग म्हणुन आपल्या गळ्यातील तुळशीची माळ काढुन निळोबांच्या गळ्यात घातली. कपाळी बुक्का लावला. सद्गुरुंनी आता आज्ञा केली,"निळोबा, आता पंचोत्री अभंग रचा"! पंचोत्री म्हणजे शंभरावर प्रेमाने दिलेले पाच जादा!
सद्गुरु दर्शनानंतर दोन महिन्यातच मैनेचं बाळंतपण झालं. मुलगी झाली. तिचं नाव ठेवलं चंद्रभागा.
तिच्या पाठीवर दोन वर्षांनी भिवोबा जन्मला. आता घर म्हणजे देउळच झालं. संत म्हणुन निळोबांची ख्याती झाली. लोक दर्शनास येउ लागले. प्रापंचिक समस्या मांडु लागले. तेव्हा निळोबा म्हणत,

हाचि उपाव सुगम सार्|तरणे संसार जया नरा||
नाम गाता गोविंदाचे| फिटे जिवाचे जिवपण||
भुक्ति मुक्ति वोळंगे येती|अंगेचि ठाकती दया क्षमा||
नीळा म्हणे अवघी सुखे| येती हरीखे चोजवीत||

बोलता बोलता १०वर्षं सरली. मध्यंतरीच्या काळात कोंडुमामा, वारुमामी गेल्या. त्यानंतर इनामदारांच्या घरात बरीच उलथापालथ झाली. धाकटा नारबा त्याची बायको पहिल्याच बाळंतपणात गेली, मुलही गेले. तेव्हापासुन तो विरक्त झाला. एक दिवस सरळ गृहत्याग करुन काशीला गेला. पलुनाना शिरुरची व्यवस्था पहाण्यासाठी प्रपंच घेउन तिकडे गेले. पारनेरची शेतीवाडी विकली. वाडा आणि एक घर विकलं. फक्त निळोबांच्या रहात्या घराचं त्यांच्या नावे दानपत्र केलं. त्यातुन दोन वर्ष दुष्काळ पडला. मोठी दैना उडाली. घरात पीठ आहे मीठ नाही अशी अवस्था. दोन वर्षांनी वरुण राजाची कृपा झाली. थोडाफार पाऊस पडला. चंद्रभागेचं(मुलगी) लग्नाचं वय झालं होतं. त्यांचे कुलोपाध्ये शेषाचार्य पोळ, जुन्नर प्रांतीचा बाल्हे गावचे कुळकर्णी अंताजी दत्तो यांच्या ज्येष्ठ पुत्राचं माधवाचं स्थळ घेउन आले. निळोबांची सांपत्तिक स्थिती सर्वसाधारण होती. वरदक्षिणा, मानपान अशक्य होतं. शिरुरास जाउन पलुनानांना अक्षत देण्यासाठी निळोबा गेले. तर पलुनानां विषमज्वराने आजारी होते. तरी त्यांनी पैशांच्या व्यवस्थेचं विचारलं.
निळोबा उत्तरले,

निजभक्ताची आवडी| सांभाळी तो घडीघडी||
राखोनिया भुक थाअन| करी तयाचा बहुमान||
वस्त्र भूषणे पुरवी| चिंता त्याची वाहे जिवी||
निळा म्हणे त्याचे उणे| पडो नेंदी कवण्या गुणे||

मनुष्यबळ कमी, तशी सांपत्तिक स्थितीही यथातथाच. म्हणता म्हणता ८ दिवसांवर लग्न आलं आणि निजभक्ताच्या कार्यासाठी प्रत्यक्ष भगवंत उभा राहिला. साक्षात परब्रम्ह सगुणरुपाने त्यांच्या घरात राबले.
निळोबारायाने आषाढी-कार्तिकीची पंढरीची वारी सुरु केली.
एक दिवस पिंपळनेरच्या रामचंद्र पाटलांचा निरोप घेउन त्यांचा पुत्र भुलाजी आला. रामचंद्र पाटील खुप आजारी होते आणि पिंपळेश्वराच्या मंदिरात आपल्या डोळ्यासमोर निळोबांचं किर्तन व्हावं अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या विनंतीचा मान ठेवुन निळोबा पिंपळनेरला आले. तब्बल एक प्रहर कीर्तनाचा थाट चालु होता. आरती झाल्यावर निळोबाने स्वहस्ते पाटलाचे कपाळी बुक्का लावला आणी पाटलांच्या दुखण्याला उतार पडला. पाटील दुखण्यातुन खडखडीत बरे झाले. आणि निळोबासारखे पुण्यवान संत आपल्या गावी कायमचे रहावे असा त्यांच्या मनात विचार आला. लगेच त्यांनी तो गावकर्यांना बोलुन दाखवला. सर्वांनी निळोबांच्या संसाराची काळजी घेण्याचं ठरलं. ओढ्याच्या अंगाला पाटलाचा वाडा होता. तो पाडुन नविन बांधकाम करुन निळोबाला रहायला द्यायचं ठरलं.
इकडे पिंपळेश्वर महादेवाने निळोबारायास सुद्धा कौल दिला. आणि ते सपरिवार पिंपळनेरास रहायला आले. निळोबाने मोठी वास्तुशांत केली. सगळे संतुष्ट झाले. तुकाराम महाराजांच्या पुण्यतिथीला गुणाजी पाथरवटाने घडवलेली तुकोबांची सुंदर मुर्ती आणली गेली. पुण्यतिथी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा झाला. तिथे निळोबाने स्वरचित आरती म्हटली.
३र्या वर्षी पुण्यतिथीस बहिणाक्का शिउराहुन आल्या होत्या. चांगल्या महिनाभर राहिल्या होत्या.
बघता बघता १८ वर्षांचा काळ सरला. निळोबांचा संसार बहरला. भिवोबा- त्यांचा एकुलता एक लेक. त्याचे लग्न सुप्याच्या नरसोपंत देशपांड्यांच्या मुलीशी- भागीरथीशी झाले. त्याला पाठोपाठ ३ मुलगेच झाले. पहिल्या नातवाचे नाव मुकुंद, मधला गणेश, व धाकटा गोपाळा...
या पावसाळ्यात निळोबांच्या वयास ५५वर्षे पुर्ण झाली आणी वयोमानाने शारीरिक व्याधी सुरु झाल्या. निळोबास गुडघेदुखी. दुखणं असं की पावसाळी दमट हवेत जोर चढे.आणि आषाढी वारी तर ऐन पावसाळ्यात. गुढघे सुजले तरी अट्टाहासाने निळोबा दिंडीत सामिल झाले. पंढरपुरी पोचताच लोकांनी त्यांना बसुन किर्तन कराय्ची विनंती केली. पण निळोबाने उभे राहुनच किर्तन केले. सद्गुरुंच्या चरित्राचे आख्यान लावले. तिथे कासेगावचे सखाराम बाळाजी हे शिष्योत्तम मिळाले. त्यांनी निळोबांची सेवा केली. आणि एक दिवस पंढरीहुन निघण्याची तयारी झाली. जातांना परत एकदा श्रीदर्शन घ्यायचे म्हणुन सगळे गाभार्यात गेले. डबडबल्या डोळ्यांनी निळोबारायांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले, आणि गहिवरल्या स्वरात म्हणाले,"देवा,आज आपला निरोप घेतांना मन व्यथित झालं आहे. पाय थकले, यापुढे वारी होईल असे वाटत नाही. गुडघे उभं राहु देत नाहीत. असो. हे देहाचे भोग आहेत ते भोगुनच संपवीन. त्याबद्दल आपल्यावर साकडे घालत नाही. पण देवा आपले दर्शन नित्य घडावे ही मात्र तीव्र आस आहे" आणि अचानक त्यांच्या मुखी अभंग आला.

पंढरीहुनि गावी जातां|वाटे खंती पंढरीनाथा||
आता बोळवीत यावे|आमुच्या गावा आम्हासवे||
तुम्हां लागी प्राण फुटे| वियोग दु:खे पूर लोटे||
निळा म्हणे पंढरीनाथा| चला गावा आमुच्या आता||

निळोबा पिंपळनेरी परतले. नित्यक्रम सुरु झाला. दसरा झाला आणि एक दिवस निळोबांना पांडुरंगाचा दृष्टांत झाला. " आम्ही उभयतां तुमचे घरी येत आहोत. तळेगावच्या विठ्ठलवाडी डोहात आमच्या मुर्ती आहेत. त्या काढुन आणा. ओसरीवर स्थापना करा. आता पिंपळनेर हेच तुमचे पंढरपुर!"
आणि सगळे उत्साहाने तयारीस लागले. तासा दीड तासात ३०-४० माणसं दारी हजर. पांडुरंगास आणण्यासाठी गाडी सजवण्यात आली. सगळे वाजत गाजत तळेगावी गेले. तळेगावापासुन अडीच कोसावर विठ्ठलवाडी गाव. भिमा नदी अथांग वाहत होती. डोहातुन सुबक मुर्ती काढण्यात आल्या. आणि लोकांनी जल्लोष केला.वाजत गाजत मुर्ती निळोबारायांच्या घरी आणण्यात आल्या. कार्तिकीएकादशीला ओसरीवरच प्रतिष्ठापना करायचं ठरलं. दिवाळीच्या वेळेसच सगळी तयारी पुर्ण झाली. बहिणाक्कांना खास निमंत्रण पाठवण्यात आलं. पहाटेपासुन प्राणप्रतिष्ठा विधी सुरु झाला. शिरुराहुन पद्मनाभाचार्य पोळ आले होते. त्यांच्या संगे ४ वैदिक होते. वाघोलीहुन आलेले सिद्धेश्वर शास्त्रीही मदत करत होते. अपेक्षेपेक्षा बहुसंखेने भाविक आलेले पाहुन निळोबांना आनंदाचे भरते आले. त्या दिवशी त्यांनी निरुपणाचा अभंग घेतला तो असा.

भक्ताचिया गावा आला| देव परमानंदे धाला||
म्हणे नवजाय येथुनि| आता भक्तासि टाकुनि||
शीण माझा हरला भाग| गोड वाटे याचा संग||
निळा म्हणे विजयी झाले| देवा भक्त घेउनि आले||

विठोबा रखुमाई- जय जय विठोबा रखुमाई....
सर्व श्रोते भक्तिप्रेमात डोलु लागले. आणि अचानक निळोबा स्वतःभोवती गोल फिरु लागले, त्यांचे डोळे विस्फारले गेले. हात जोडुन जणु भान विसरुन स्वतःभोवती गिरक्या घेउ लागले, अभंग म्हणु लागले.

किर्तनाची आवडी मोठी| धांवे पाठी वैष्णवां||
जेथे होती नामघोषे| नाचे उल्हासे ते ठायां||
ऐकोनिया अपुली किर्ती| सुखे जगपति सुखावे||
निळा म्हणे टाळीया छंदे| डुले आनंदे सुप्रेमे||

बहिणाक्काही वारंवार भुईस डोके टेकवुन नमन करीत होत्या. त्यांच्या डोळ्यातुन प्रेमाश्रु वहात होअते.
सद्गदित स्वरात निळोबा म्हणत होते," देवा, हा काय तुमचा छंद म्हणावा! किती नाचताहात? कुंची सुटली ना! मुकुंदा, घननीळा, शामसुंदरा, हा काय यमुनातट वाटला की काय?"
निरुपणाशी विसंगत असे त्यांचे बोलणे ऐकुन श्रोते एकमेकांकडे पाहु लागले. निळोबांनी नंतर खुलास केला की तो दोष आमचा नाही. त्या लीला नाटकी श्रीहरीचा खेळ होता. तो मनमोहन बाळकृष्ण गोपवेशात येथे नाचत होता! अहाहा... काय गोजिरे रुप!
सर्वजण भान हरपुन ऐकत होते. उधळलेल्या बुक्क्यात श्रीहरीची पाऊले दिसत होती. लोकांनी त्या पावलांवर डोके ठेवले.
मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा महाप्रसाद म्हणुन मोतीचुराचे लाडु आणि एकादशीचे पारणे म्हणुन शिरापुरीचा बेत होता. लाडु नवमीलाच बांधुन झाले. मध्यान्हीस श्रीविठ्ठल रखुमाईस नैवेद्य दाखवुन आरती सुरु झाली. आणि लगेच निरोप आला की घरातलं सगळं तुप संपलय. आता पंगतीत अन्नशुद्धीलाही तुप उरलं नाही. होतं तेवढं नैवेद्याच्या पानावर घातलं. सुप्यास तुप आणायला गेलेल्या सदुचा अजुनही पत्ता नव्हता. भातावर वाढायला तुप नाही. सर्वांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला. बहिणाक्का म्हणाल्या," चिंता कशाला करता? तो ओसरीवर श्रीहरी उभा आहे ना कमरेवर हात ठेवुन! तोच सोय करील!
निळोबांना ही बातमी कळली. क्षणभर ते गंभीर झाले. नंतर हात जोडुन श्रीमुर्तीपुढे उभे राहिले. १०-१५ क्षण त्यांच्या देहाची काष्ठवत अवस्था झाली. नंतर एकदम भानावर आल्यासारखे अंग झटक्यात हलवुन निळोबा म्हणाले," चला मागील आडाकडे"
पोहरा नदीत सोडत म्हणाले,"तुपाच्या कासंड्या मागवुन घ्या"
त्यांनी "श्रीहरी, श्रीहरी' म्हणत पोहरा ओढायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य! पोहरा रवाळ तुपाने थबथबलेला! ""विठ्ठल विठ्ठल"" म्हणत पोहरा कासंडीत ओतला वर परत आडात सोडला. असे एकुन ४ पोहरे काढले,...तीन कासंड्या भरल्या.
मग सदु सुप्याहुन तूप आणील तेव्हा ४ पोहरे तूप परत आडात सोडण्याची आज्ञा देवुन निळोबा पंगतींकडे आले. पंगतीवर पंगती उठल्या. सायंकाळी निवडक गावकर्यांची पंगत बसली तेव्हा सदोबाची गाडी आली. त्याने चांगले दोन मण तूप आणले होते. गाडीचा एक बैल पान लागुन गतप्राण झाला होत म्हणुन त्याला उशीर झाला होता. मग आज्ञेप्रमाणे आधी त्याने चार पोहरे तूप आडात ओतलं.
आणि एके दिवशी दक्षिणेचे सरसुभा शहाजादा मुअज्जम याच्याकडुन सुभेदार आला. ते निळोबारायांना पिंपळनेर, वडुली, राळेगणसिद्धी ही गावे वंशपरंपरेने इनाम दिल्याचा निरोप घेउन. निळोबांनी त्यामुळे श्रीहरीच्या चिंतनात व्यत्यय येत असल्याचे सांगुन आदरपुर्वक या गोष्टीला नकार दिला. मग त्यांच्या वतीने भुलाजी पाटील यांनी व्यवहार सांभाळायचे ठरले. ४ दिवसांनी सुप्याहुन निळोबारायांस पालखीचा सरंजाम ही आला. सोबत भरजरी पोषाख आणि अलंकार. निळोबांनी विनम्रपणे सारा सरंजाम परत पाठविला.
अश्विन नवरात्र सुरु झाले आणि चवथ्याच दिवशी निरोप आला की अश्विन शु. प्रतिपदेलाच बहिणाक्कांनी देह ठेवला. निळोबांना शोक अनावर झाला.
काही दिवसानंतर कार्तिकी एकादशी साधुन पलुनानांनीही देह ठेवला. निळोबा अजुनच उदासीन राहु लागले. इनामदारी मिळुन वर्ष होत आलं होतं. पण निळोबांचं ते तंटे-बखेडे सोडवण्यात मन लागलं नाही. एका संध्याकाळी त्यांनी सुभेदारास पत्र लिहुन सनद परत केली आणि त्यांच्या डोक्यावरचं मोठं ओझं उतरलं. पण सुभेदाराच्या आग्रहावरुन वर्षभराचा वसुल सव्वाशे होन व दोन खंडी ज्वारी घेतली. त्याच वर्षी मोठा दुष्काळ पडला. विहीरी आटल्या. अन्नाची दैना उडाली. तेव्हा त्यांनी वसुलीतले दोन खंडी ज्वारीही गोरगरीबांना द्यायला काढली. लोक गावं सोडुन परमुलुखात जाऊ लागले. गावं ओस पडली. अशा परिस्थितीत भुलाजी पाटलाचा देहांत झाला. निळोबांच्या घरातलं किडुकमिडुक संपत आलं. निळोबा पांडुरंगाला आळवत होते. आणी पुन्हा एक दिवस पंढरपुराहुन पांडुरंग 'विठाजीशेट्टी' होउन मणभर ज्वारी देउन गेला.
निळोबा आता थकत चालले होते. पंच्याहत्तरी सुरु झाली. उभं राहुन किर्तन आता कष्टप्रद होउ लागले. मग किर्तन बसुनच होउ लागलं. कामरगावी पौर्णिमेस श्रीहरीच्या मुर्तीस्थापनेवेळेस निळोबांचं किर्तन होतं. त्याला अट्टल गुन्हेगार भिमाप्पा वंजारी आला होता. त्याने महाराजांचं किर्तन ऐकुन आपला वाटमारीचा धंदा सोडला.
अलीकडे निळोबांना जास्तच अशक्तपणा वाटु लागला होता. उठता बसता आधार घ्यावा लागे. माही पौर्णिमेपासुन क्षीणता वाढली. अन्न तर जवळपास सुटलेच. थरथरत्या आवाजात ते अभंग म्हणु लागले.

तुमचे चरणी राहो मन| करा हे दान कृपेचे||
नामी तुमचे रंगो वाचा| अंगी प्रेमाचा आविर्भाव||
हृदयी राहो तुमची मुर्ती| वाचे कीर्ति पवाडे||
निळा म्हणे ठेवा ठायी| जीवभाव पायी आपुलिये||

माही अमावस्येला त्यांची अवस्था गंभीरच झाली. हालचाल मंदावली. मात्र स्मृती आणि वाणी तरतरीत होती. दुसरे दिवशी फाल्गुन शुद्ध प्रतिपदा लागली. त्यांच्या आज्ञेप्रमाणे पहाटेच विठ्ठल्-रखुमाईची पूजा करण्यात आली. आरतीच्या वेळी थरथरत्या हातांनी निळोबा टाळ्या वाजवण्याचा प्रयत्न करत होते.
भिवोबा (मुलाने) त्यांना मांडी दिली. त्यांच्या मुखात श्रीचरणीचे तुळशीपत्र घालण्यात आले. गंगाजलही टाकण्यात आले आणि "श्रीहरी' असा त्रिवार उच्चार करत निळोबांनी देह ठेवला.
गावोगावी निरोप पाठवले गेले. दुपारपर्यंत हजार एक माणुस जमला. आवश्यक विधी होउन अंत्ययात्रा निघाली. सुप्याहुन चंदनाचे ओंडके आणले गेले. ओढ्याकाठी चिता रचली. भिवोबाने शास्त्रानुसार यथासांग विधी करुन चितेस अग्नी दिला.
डोंगराआड जाणारा भगवान सूर्यनारायण आपल्या सोनेरी किरणांनी निळोबांना अखेरची मानवंदना देत होता.....
*****************************************************
पुस्तकाचे नावः "तुमचे पायी ठेविले मन"
लेखकः नीळकंठ नांदुरकर
प्रकाशक बुकमार्क पब्लिकेशन्स, पुणे